Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, राजापुरात अर्जुना आणि कोदवली नदीला पूर

गेले तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सततच्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना नदी आणि कोदवली नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी राजापूर शहरातील जवाहर चौकात शिरले. पुरामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 113.54 मिमी पावसाची नोंद झाली.

अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुराने राजापूर शहरासह ग्रामीण भागाला वेढले आहे. शहरातील बहुतांश भागामध्ये पुराचे पाणी घुसले. ग्रामीण भागातील शिळ-गोठणेदोनिवडे रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यातच अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुरामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन, तहसिलदार विकास गंबरे, नगर परिषदेचे मुख्य लिपीक जितेंद्र जाधव यांनी जवाहर चौकामध्ये पूरस्थितीची पाहणी करून लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. तर, प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

दापोली ते दाभोळ रस्त्यावर सकाळी झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मात्र झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. शहरानजीकचा शीळ-गोठणेदोनिवडे रस्ताही पुराच्या पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नद्यांच्या काठावरील शीळ, गोठणोदोनिवडे, आंगले, दोनिवडे आदी गावांमधील भातशेतीही पुराच्या पाण्याखाली गेली होती.

गेल्या 24 तासात जिल्ह्यात 113.54 मिमी पाऊस पडला. त्यामध्ये मंडणगड – 66.50 मिमी, खेड – 107.28 मिमी, दापोली – 96.14 मिमी, चिपळूण – 128.33 मिमी, गुहागर – 136.80 मिमी, संगमेश्वर – 129.50 मिमी, रत्नागिरी – 99.77 मिमी ,लांजा – 139.60 मिमी राजापूर – 118.00 मिमी पाऊस पडला.

दोन नद्यांनी गाठली इशारा पातळी

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. आज सकाळी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी गाठली.