होय! मी महाराष्ट्र पेटवतोय…व्हायरल क्लिपबाबतच्या आरोपांना रोहित पवारांचे प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून एमपीएससी पेपरफूटी प्रकरण लावून धरत आहेत. यावरून ते सातत्याने राज्य सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडत आहेत. तलाठी भरतीच्या शुल्कावरूनही रोहित पवार राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आता रोहित पवार यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ते सांगत आहेत की, परीक्षा फीच्या (शुल्क) विषयात सरकार काही ऐकत नाही, त्यामुळे हा विषय थोडा पेटवत ठेवावा लागेल. यावरून सोशल मीडियावर रोहित पवार यांच्यावर टीका सुरू आहे. या टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

रोहित पवार यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे. ते म्हणाले की, भाजपाची ट्रोल गँग माझ्याविरोधात अचानक सक्रीय होऊन मला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. या ट्रोल गँगचा विषय काय तर रोहित पवार राज्यातल्या युवकांना पेटवत आहे. एक महिन्यापूर्वीची फोन क्लिप व्हायरल केली जात आहे, ज्यात मी म्हणत आहे की, परीक्षा फीच्या (शुल्क) विषयात सरकार काही ऐकत नाही त्यामुळे हा विषय थोडा पेटवत ठेवावा लागेल. त्याशिवाय हा विषय सुटणार नाही. काही लोकांना आंदोलन करायला सांगितले आहे. त्याशिवाय हे सरकार सुधारणार नाही. सरकारने गाभीर्याने सांगावं यात काय चुकीचं आहे?, असा सवाल त्यांनी केला आहे.

रोहित पवार म्हणाले की, सरकारने परीक्षा शुल्काच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांची लुटमार करायची, पेपरफुटी होत असताना दुर्लक्ष करायचे, कंत्राटीकरणाला बळ द्यायचे, युवा वर्गाच्या आयुष्याचा खेळ मांडायचा. आता या विषयांवर सत्तेच्या मस्तीत बेधुंद असलेल्या सरकारला जाब विचारून विद्यार्थ्यांची भूमिका मांडणे म्हणजे महाराष्ट्र पेटवणे असेल तर होय, मी महाराष्ट्र पेटवतोय! राज्य सरकारला इशारा देत म्हणाले, तुम्हाला महाराष्ट्र पेटू द्यायचा नसेल तर पेपरफूटीसंदर्भात कायदा करा, गोरगरीब विद्यार्थ्यांकडून लुटलेली परीक्षा फी परत करा, कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करा, असा इशारा त्यांनी दिला आहे. विद्यार्थ्यानी सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही सरकार झोपेचं सोंग घेत असेल, या सरकारपर्यंत विद्यार्थ्यांचा आवाज पोहचणार नसेल, तर या सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर तर उतरावंच लागेल, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.