सामना अग्रलेख – ‘नवीन नागपूर’च्या निमित्ताने…

‘नवीन नागपूर’ची उभारणी कराच, पण राज्यातील इतरही ‘मेट्रो’ शहरांबाबत हा विचार करा. कारण या सर्वच शहरांची अवस्था आज अनियंत्रित अशी झाली आहे. मुख्यमंत्री महोदय, नागपूरवर सर्वांचे प्रेम आहे. ते तुमचे ‘गाव’ असल्याने तुमचे प्रेम काकणभर जास्त आहे असे समजूया, परंतु हेच प्रेम राज्यातील इतर छोट्या-मोठ्या शहरांना मिळू द्या. ‘नवीन नागपूर’प्रमाणे राज्यात ‘नवीन पुणे’, ‘नवीन नाशिक’, ‘नवीन कोल्हापूर’, ‘नवीन छत्रपती संभाजीनगर’ असा विकासाचा नवा रोडमॅप राबविता येऊ शकतो. तरच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राज्याचा समतोल विकास साध्य होऊ शकेल. ‘नवीन नागपूर’च्या निमित्ताने हे घडावे इतकेच!

नागपुरात ‘आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्तीय केंद्र’ (आयबीएफसी) विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर ‘नवीन नागपूर’ उभारण्याचा सरकारचा मानस आहे. त्याअंतर्गत हे नवीन आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र उभारले जाणार आहे. नागपुरातील हिंगणातील गोधणी आणि लाडगाव येथे सुमारे 690 हेक्टर जमिनीवर हे भव्य केंद्र असेल. मुख्यमंत्री फडणवीस नागपूरचे असल्याने त्यांनी या केंद्रासाठी नागपूरला प्राधान्य दिले असे म्हटले जाऊ शकते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सर्व प्रकारच्या वित्तीय संस्था, त्यांची मुख्यालये, सेवा केंद्रे, शेअर बाजार हे सगळे मुंबईमध्ये आहे. त्यामुळेच देशात जेव्हा आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) उभारण्याचे ठरले तेव्हा मुंबईचीच निवड करण्यात आली. मात्र देशात मोदी राजवट आल्यापासून त्यांना आणि त्यांच्या पक्षाला खुपत असलेले मुंबईचे महत्त्व वारंवार

चव्हाट्यावर

आले. त्यातूनच मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राला पर्याय म्हणून गुजरातेत ‘गिफ्ट सिटी’ विक्रमी वेळेत उभारण्यात आली. साहजिकच आता नागपुरात ‘आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्तीय केंद्र’ (आयबीएफसी) उभारणार म्हटल्यावर वेगवेगळे तर्क-कुतर्क लढवले जाऊ शकतात. मुंबईत पूर्वापार आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र असताना नागपुरात आणखी एका केंद्राचा खटाटोप कशासाठी? असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. अर्थात सरकारचे त्यावरील स्पष्टीकरण वेगळे आहे. त्यामागे कोणताही छुपा अजेंडा नसून राज्याच्या समतोल विकासाचा विचार आहे, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. त्यांचे हे म्हणणे खरे मानले तरी त्यांनी हाच विचार आणखी व्यापकपणे पुढे न्यायला हवा. नागपुरातील नवीन आंतरराष्ट्रीय केंद्राने विकासाला चालना मिळणार असेल तर चांगलेच आहे. फक्त मुख्यमंत्र्यांनी तेवढ्यावरच थांबू नये इतकेच. नागपूर हे त्यांचे ‘होम टाऊन’ आहे. त्यामुळे राज्यातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्तीय केंद्रासाठी त्यांनी नागपूरची निवड केली असेलही, पण ‘नवीन नागपूर’ असो की त्यातील आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र, शेवटी राज्याच्याच

विकासात भर

घालणार आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातमध्ये नेणे, महाराष्ट्रात येणारे उद्योग-प्रकल्प गुजरातेत नेणे या गोष्टी वेगळ्या आणि महाराष्ट्राच्या उपराजधानीतच एखादे वित्तीय केंद्र उभारणे वेगळे. ‘नवीन नागपूर’ची उभारणी कराच, पण राज्यातील इतरही ‘मेट्रो’ शहरांबाबत हा विचार करा. कारण या सर्वच शहरांची अवस्था आज अनियंत्रित अशी झाली आहे. नगर नियोजनाची ऐशी की तैशी झाली आहे. लोंढ्यांमुळे किमान प्राथमिक सोयी-सुविधांवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे इतर मोठ्या शहरांच्याही नियोजनबद्ध विकासाचा विचार सरकारने करावा. मुख्यमंत्री महोदय, नागपूरवर सर्वांचेच प्रेम आहे. ते तुमचे ‘गाव’ असल्याने तुमचे प्रेम काकणभर जास्त आहे असे समजूया, परंतु हेच प्रेम राज्यातील इतर छोट्या-मोठ्या शहरांना मिळू द्या. ‘नवीन नागपूर’प्रमाणे राज्यात ‘नवीन पुणे’, ‘नवीन नाशिक’, ‘नवीन कोल्हापूर’, ‘नवीन छत्रपती संभाजीनगर’ असा विकासाचा नवा रोडमॅप राबविता येऊ शकतो. तरच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राज्याचा समतोल विकास साध्य होऊ शकेल. ‘नवीन नागपूर’च्या निमित्ताने हे घडावे इतकेच!