
संगमनेर तालुक्यातील साकूर पठार परिसरातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली असून या घटनेत दोन अल्पवयीन मुलींनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे समजते. मानसी राजेंद्र सगळगिळे (15) तन्वी अजित सगळगिळे (17) अशी आत्महत्या केलेल्या मुलींची नावे आहेत. मानसी ही इयत्ता नववीत शिकत होती.
तालुक्यातील साकूर शिवारातील बनवस्ती येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशीच हृदय हेलावणारी घटना घडली आहे. सख्ख्या चुलत बहिणींनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण पठार भागासह संगमनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. नेहमी प्रमाणे शनिवारी सकाळी सगळगिळे कुटुंब शेतात कामाला गेले होते. तन्वी व मानसी दोघीच घरी होत्या. मात्र दुपारी चारनंतर तन्वीने एका घरात व मानसीने दुसऱ्या घरात गळफास घेतल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी तन्वी व मानसीला तातडीने ग्रामीण रुग्णालय, साकूर येथे दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक बांधले, तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले.
मात्र दोन्ही अल्पवयीन चुलत बहिणींनी असे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे.सदरची घटना घातपात की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या दोघींच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबत घारगाव पोलिसांशी संपर्क केला असता तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने तालुक्यात शोककळा पसरली आहे.