जोगेश्वरीतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकासाला गती द्या, शिवसेनेची एसआरए प्राधिकरणाकडे मागणी

मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या जोगेश्वरी पूर्वेला असणार्या झोपडपट्टय़ांच्या विकासाला म्हणावी तशी चालना मिळालेली नाही. मागील अनेक वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची कामे रखडली आहेत. परिणामी नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असून झोपडीधारकांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जोगेश्वरीतील रखडलेल्या पुनर्विकास योजनांना गती द्या, अशी मागणी शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांनी एसआरए प्राधिकरणाकडे केली आहे.

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची कामे विविध कारणांमुळे खोळंबली आहेत. एसआरए योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विकासकाकडून झोपडीधारकांना घरभाडे वेळेवर दिले जात नाही. अनेक झोपडीधारक हे मागील दहा ते कंधरा वर्षांपासून घराचा ताबा कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहेत. झोपडय़ा अर्धवट तोडून पुनर्विकासाचे काम थांबविल्यामुळे नागरी सोयीसुविधांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळा नर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास अधिकारी देशमुख, म्हसाळ, मानेकर आणि मुंडे यांची भेट घेऊन चर्चा केली. पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या जोगेश्वरीतील झोपडीधारकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेना जोगेश्वरी विधानसभा समन्वयक रवींद्र (बावा) साळवी यावेळी उपस्थित होते.