लग्नात स्कोडा कार, 15 तोळे सोने देऊनही पैशांसाठी पतीसह सासरच्यांकडून मारहाण, महिला आयोगाकडून तक्रारीची दखल नाही; ऐश्वर्या हुलावळे यांचा आरोप

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजे असतानाच लग्नात स्कोडा कार, 15 तोळे सोने तसेच इतर महागडय़ा वस्तू देऊनही पैशांसाठी पती, सासू, दीर, मावस सासू-सासऱ्यांनी छळ केल्याचा प्रकार हिंजवडी येथे उघडकीस आला आहे. काठी, बेल्ट, हाताने मारहाण केल्याचा आरोप ऐश्वर्या आदित्य हुलावळे यांनी सोमवारी चिंचवड येथे पत्रकार परिषदेत केला. दोन महिन्यांपूर्वी महिला आयोगाकडे तक्रार देऊनही त्याची दखल घेतली नसल्याचा आरोपही ऐश्वर्या यांनी केला. यावेळी त्यांचे आई-वडील उपस्थित होते.

ऐश्वर्या हुलावळे म्हणाल्या, आदित्य हुलावळे यांच्याशी 28 फेब्रुवारी 2017 रोजी भोसरीत लग्न झाले. सासरकडच्यांनी लग्नात मागणी केल्याप्रमाणे एक स्कोडा कार, 15 तोळे सोन्याचे दागिने व अन्य सुखसुविधांच्या सर्व वस्तू दिल्या गेल्या. वडील 81 टक्के अपंग असतानाही त्यांनी जमीन विकून वस्तू दिल्या. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर माहेरहून पैसे आणण्यासाठी पती, सासू, दीर, आजोबा, मावस सासू, मावस सासरे यांनी छळ करण्यास सुरुवात केली. पतीचे बाहेरील अनैतिक संबंध कळल्यावर तक्रार केली असता सासरच्यांनी मारहाण केली. तसेच माहेरहून पाच लाख रुपये घेऊन आल्यास नांदवू, अन्यथा घरातून निघून जा, अशी धमकी दिली. मारहाण केली. वारंवार होत असलेले अत्याचार, शिवीगाळ, धमक्या देत असल्याने डिसेंबर 2017 रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या वेळी पोलीस ठाण्यातही सासरच्यांकडून तू जर तक्रार दाखल केली, तर आम्ही तुला नांदवणार नाही, अशी धमकी दिली गेली. भाजीमध्ये उंदीर मारण्याचे औषध दिल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन 5 जानेवारी आणि 15 जानेवारी 2018 रोजी पुन्हा तक्रार अर्ज दिला. या वेळी दोन्ही कुटुंबाला एकत्रित बोलावून एकमेकांची समजूत काढून मिटवून घेण्यास सांगितले गेले. मात्र या वेळीदेखील प्रकरण मिटले नाही. त्यानंतर पुन्हा 3 मार्च 2018 रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल केला. मात्र पोलिसांकडून तक्रारीची दखल घेतली गेली नाही. अखेर 24 डिसेंबर 2018 रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सप्टेंबर 2018मध्ये पतीकडून घटस्फोटाबाबत पत्र देण्यात आले आहे. तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली जात असल्याचा आरोपही ऐश्वर्या यांनी केला.

भाजप शहराध्यक्षांच्या भावासह इतरांनी धक्के देऊन बाहेर काढले

पिंपळे-सौदागर येथील सासरच्या कार्यक्रमासाठी 24 मार्च 2025 रोजी मी आली असता मला मारहाण करण्यात आली. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे बंधू भरत काटे यांच्यासह 20 ते 25 जणांनी शिवीगाळ करीत धक्के देऊन मला बाहेर काढले. याबाबत सांगवी पोलिसांनी केवळ तक्रार अर्ज घेतला. गुन्हा दाखल केला नाही, याबाबतचे पत्र राज्य महिला आयोगाला व्हॉटसअॅपवर पाठवले होते. अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या संपर्कात होते. त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ऐश्वर्या हुलावळे यांनी केला. दरम्यान या प्रकरणात हिंजवडीतील गुह्याचा तपास झाला आहे. आरोपपत्र दाखल केले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.