
मराठमोळ्या स्मृती मानधना हिने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 लढतीमध्ये खणखणीत शतक ठोकत इतिहास रचला आहे. नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानात झालेल्या पहिल्या लढतीत स्मृतीने आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. यासह आजपर्यंत हिंदुस्थानच्या एकाही महिला खेळाडूला जमला नाही असा विक्रमही तिने आपल्या नावावर केला. क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक ठोकणारी ती पहिली हिंदुस्थानी महिला क्रिकेटर ठरली आहे.
हिंदुस्थानचा महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन्ही उभय संघात पाच टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना शनिवारी नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळला गेला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत हिंदुस्थानचे नेतृत्व करणारी स्मृती मानधना आणि शेफाली वर्माने डावाची सुरुवात केली. दोघींनी हिंदुस्थानला 77 धावांची सलामी दिली.
शेफाली 20 धावा काढून बाद झाली आणि हिंदुस्थानला पहिला धक्का बसला. या धक्क्यातून सावरत स्मृतीने चौफेर फटकेबाजी सुरू केली आणि अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्यानंतर तिने आपले गिअर बदलले आणि इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत शतकाच्या दिशेने कूच केले. 51 चेंडूत तिने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील पहिले शतक ठोकले. यासह क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक ठोकण्याचा मान मिळवणारी ती हिंदुस्थानची पहिली महिला खेळाडू बनली.
Maiden T20I Hundred for Smriti Mandhana! 💯 👌
What a knock from the captain & what a way to bring it up in style 👏
Updates ▶️ https://t.co/iZwkYt7Crg#TeamIndia | #ENGvIND | @mandhana_smriti pic.twitter.com/Gv2Yar5R4z
— BCCI Women (@BCCIWomen) June 28, 2025
बाद होण्यापूर्वी स्मृतीने 62 चेंडूंचा सामना करत 15 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 112 धावा चोपल्या. यासह तिने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. याआधी टी20 क्रिकेटमध्ये हिंदुस्थानकडून खेळताना सर्वाधिक धावांचा विक्रम हरमनप्रीत कौरच्या नावावर होता. तिने 2018 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत नाबाद 103 धावांची खेळी केली होती. मात्र हा विक्रम आता स्मृतीने आपल्या नावे केला.
हिंदुस्थानचा बलाढ्य विजय
दरम्यान, स्मृतीच्या 112 आणि हरलीन देओलच्या 43 धावांच्या बळावर हिंदुस्थानने 20 षटकात 210 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव 113 धावांमध्ये गुंडाळत 97 धावांनी बलाढ्य विजय मिळवला. गोलंदाजीत एन. श्री चरणी हिने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर राधा यादव, दिप्ती शर्माला प्रत्येकी दोन आणि अरुंधती रेड्डी, अमनज्योत कौरला प्रत्येकी एक विकेट मिळाली.