‘आषाढी’साठी एसटीच्या 5200 विशेष बसेस सोडणार; ग्रुप बुकिंग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार

आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठय़ा प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱयातून येणाऱया भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात 5 हजार 200 विशेष बस सोडण्याचे नियोजन केल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बसस्थानक, पंढरपूर येथे एसटी महामंडळाच्या अधिकाऱयांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

परिवहनमंत्री सरनाईक म्हणाले, यंदा राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी पंढरपुरात येतात. अनेक प्रवाशी स्वतःच्या खासगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालख्यांबरोबर चालत दिंडीने येतात. या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर, अशी बससेवा उपलब्ध करून दिली आहे. या प्रवासातदेखील 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50 टक्के तिकीटदरात सूट देणारी महिला सन्मान योजना यांसारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.

आषाढी यात्राकाळात लांबच्या पल्ल्याहून एसटी बसेस येत असतात. त्या बसचालकांना व वाहकांना राहण्याची चांगली व्यवस्था करावी, त्याचबरोबर त्यांना अंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून द्यावे. बसस्थानकातून बस प्रवाशांना घेऊन जाण्याअगोदर बसची देखभाल दुरुस्ती करावी. एसटी बसच्या तत्काळ दुरुस्तीसाठी ज्यादा तांत्रिक कर्मचाऱयांची नियुक्ती करावी, अशा सूचनाही परिवहनमंत्री सरनाईक यांनी केल्या.

गतवर्षी वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त 5000 विशेष बसेस सोडल्या होत्या. याद्वारे यात्राकाळामध्ये सुमारे 21 लाख, भाविक – प्रवाशांची सुखरुप ने-आण एसटीने केली होती, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱयांनी यावेळी दिली.

यात्राकालावधीत तात्पूरर्ती चार बसस्थानके उभारणार

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहाता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत.

जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱया बसेस

चंद्रभागा बसस्थानक येथून – मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार n भीमा यात्रा देगाव येथून – छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती प्रदेश n विठ्ठल कारखाना बसस्थानकावरून – नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर n पांडुरंग बसस्थानक येथून – सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

वाहतुकीच्या नियोजनासाठी एसटीची मदत

एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात. अशावेळी रस्त्यावर वाहतूककोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होतो. यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने 36 पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक व सुरक्षारक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस प्रशासनाला एसटीची मदत होणार आहे.

विनातिकीट प्रवास करणाऱया प्रवाशांना लगाम

यात्राकाळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे, अशाप्रकारे फुकट प्रवास करणाऱया प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱया विविध मार्गांवर 12 ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे. अशा फुकटय़ा प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे 200 सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्राकाळात 24 तास नजर ठेवून असणार आहेत.