पंचवीस वर्षांनी कसाल हायस्कूल, कॉलेजच्या विद्यार्थ्यांची भरली शाळा; प्रचंड उत्साहात स्नेह मेळावा साजरा

वेळ सकाळी ८.३० वाजताची… न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कसालमध्ये विद्यार्थ्यांची मोठी लगबग सुरू होती. एकामागून एक विद्यार्थी जमा होत होते. मात्र आज त्यांच्या पाठीवर दप्तर नव्हते… ना होमवर्क किंवा लेक्चरचे टेन्शन… युनिफॉर्मचेही टेन्शन नसल्याने प्रत्येकजण आपल्याला आवडत्या पेहरावात शाळेत हजर झाला होता. चेहर्‍यावर फक्त आनंद ओसंडून वाहत होता… तो म्हणजे एक दोन नव्हे तर तब्बल २५ वर्षांनंतर मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा… १९९९ च्या बॅचचे दहावी ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’चे विद्यार्थी आणि फेब्रुवारी २००१च्या बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे विद्यार्थी तब्बल २५ वर्षांनी एकत्र आले. गुरूजनांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात स्नेह मेळावा अर्थात गेट टुगेदर साजरा झाला.

कार्यक्रमाचा शुभारंभ सुरुवात दीप प्रज्वलन व राष्ट्रगीताने झाला. यानंतर दिवंगत विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना अभिवादन करून पुढील कार्यक्रम सुरू झाला. शाळा भरल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही साने गुरूजींची प्रार्थना विद्यार्थ्यांनी एका सुरात म्हटली. यावेळी विद्यार्थ्याने स्वत:ची ओळख करून देत आपण शिक्षक, डॉक्टर, सैन्य, आरोग्य, खासगी व्यवसाय, खासगी कंपन्या, सरकारी क्षेत्र, पत्रकारिता, शेती अशा कार्यक्षेत्रात नाव कमावल्याचे सांगितले. याचा उपस्थित शिक्षकांनी गौरव करीत आपल्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि आनंदाने काम करा, यशस्वी व्हा, प्रकृतीची काळजी घेऊन सुखाने-आनंदाने जीवन जगा असा आशीर्वादही सर्व शिक्षकांनी मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना दिला. दरम्यान,स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची देणगी यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात देण्यासाठी शाळेला देण्याचेही जाहीर करण्यात आले.

धम्माल, मस्ती, गप्पा आणि गाणी

स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना आठवण म्हणून शाळेचा लोगो, विद्यार्थ्याचे नाव असलेला आकर्षक मग भेट म्हणून देण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यानंतर वेळ होती धम्माल, मस्ती, गप्पा आणि गाणी अशा सांस्कृतिक रेलचेलीची. याशिवाय विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याचा आनंद लुटला. तब्बल २५ वर्षांनी एकत्र आल्यामुळे झालेला आनंद गगनात मावेनासा झालेल्या विद्यार्थ्यांनी अखेर पुन्हा लवकरच भेटण्याचा निश्चय करून निरोप घेतला.