तुंबलेल्या शहराला, घरांच्या नुकसानीला जबाबदार कोण? शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

जोरदार पावसामुळे कोल्हापूर शहर पुन्हा एकदा तुंबले. अनावश्यक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत केलेल्या रस्त्याच्या उंचीवरून लोकांच्या घरांत, दुकानात घुसलेले पाणी हतबलपणे पाहणारा कोल्हापूरचा नागरिक… असे एक विदीर्ण आणि विदारक चित्र कोल्हापूरला आज पाहायला मिळाले. एक जबाबदार म्हणून अपयशी ठरलेल्या लोकप्रतिनिधींच्या अपयशासह लोकांकडून नियमित कर घेणाऱया महापालिकेचा असंवेदनशीलतेचा कळस असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात अजूनही मोठय़ा प्रमाणात नालेसफाई, गटारांची दुरुस्ती, सफाई व वाढलेल्या रस्त्यांची उंची त्वरित बाजूच्या घरांना योग्य ती सम प्रमाणात करून पाण्याचा निचरा करावा, अन्यथा भर पावसात महापालिकेसमोर कोल्हापूरच्या जनतेसह शंखध्वनी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्याला पूर आला. या ओढय़ाचे पाणी शास्त्रीनगर रेसिडेन्सी कॉलनीतील अनेकांच्या घरांमध्ये घुसले. या पाण्यातून सुभाष आप्पासाहेब घाडगे, शुभांगी सुभाष गाडगे यांना सुखरूप रेस्क्यू करण्यात आले आहे. स्टेशन ऑफिसर जयवंत खोत, ड्रायव्हर रजाक मुलानी, फायरमन रोहन लकडे यांनी या दाम्पत्याला सुखरूप बाहेर काढले.