भाजप आमदारानं आरोप केल्यानंतरही मिंध्यांवर कारवाई का नाही? कुठे आहेत गृहमंत्री? उद्धव ठाकरे यांचे खरमरीत सवाल

राजापूर येथील जवाहर चौकात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. कल्याणमधील घटनेचा उल्लेख करून भाजप आमदारानं आरोप केल्यानंतरही मिंध्यांवर कारवाई का नाही? कुठे आहेत गृहमंत्री? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी राजन साळवी यांची पाठ थोपटली. ‘ईडीने राजन साळवी यांच्यावर आरोप केले. राजन साळवी यांची मालमत्ता सापडली असेल तर, राजापुरामध्ये जे नवीन इच्छुक उमेदवार खर्च करत आहेत, त्यांच्या घरी आधी धाड टाका. त्यांनी पैसे कुठून आणले, ज्यांच्या घरी धाड टाका. त्यांच्या संपत्तीची चौकशी करा, जाहिराती करतायत, त्यांची चौकशी करा’, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं.

आमचं हिंदुत्व भाजपपेक्षा वेगळं

हिंदुत्वावरून भाजप शिवसेनेला लक्ष्य करण्याचं प्रयत्न करतं. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा तोफ डागली. ‘रायगड मधल्या मुस्लिम बांधवांनी आम्हाला मराठीतील कुराण दिले, त्यांना आपले हिंदुत्व कळलं आहे. आमचं हिंदुत्व धर्माधर्मात आग लावणारं नाही’, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

पुढे बोलताना ‘राजनला धन्यवाद आणि त्याची पाठ थोपटायला आलो आहे’, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ‘देशभरात भाजपच्या कारभाराचे चटके बसतायत. राजन साळवींच्या घरातील वस्तूंची काय किंमत लावली आहे त्याची यादीच त्यांनी दाखवली आणि ‘शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत कशी लावता?’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी एसीबी अधिकाऱ्यांना विचारला.

‘राजन साळवींच्या घरी काही मिळालं नाही म्हणून वस्तूंची किंमत काढली. एसीबी अधिकाऱ्यांनी शिवरायांच्या मूर्तीची किंमत लावली. मिंधेच्या पक्षात जात नाही म्हणून राजन साळवींवर कारवाई करण्यात येत आहे’, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

‘मी पंतप्रधानांना नाही, ते मला शत्रू मानतात. कारण त्यांनी आपली शिवसेना फोडली, शिवसेना चोरली. ज्या बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या संकट काळात मदत केली होती, त्या बाळासाहेबांची त्यांनी चोरी केली. चोराला मदत केली, चोराला मुख्यमंत्री म्हणून बसवला. तिकडे नितीश कुमारांना तोडलं, सोरेन यांना तुरुंगात टाकलं. केजरीवालांच्या मागे लागलेत. राजन साळवी, वायकर, सूरज चव्हाण यांच्याही मागे लागले आहेत’, असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं.