ऊसउत्पादन वाढीसाठी ‘एआय’चा वापर करणार; ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे प्रतिपादन

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर आता सर्वच क्षेत्रांत होत आहे. याचा वापर कृषी क्षेत्रात होण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटने सर्व कारखानदारांची बैठक घेऊन ऊसउत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. तसेच इतर क्षेत्रांतही एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास निश्चितच फायदा होईल, असे मत राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

ऍड. रावसाहेब शिंदे यांची जयंती व ज्युनियर कॉलेजच्या नूतन वास्तूचे उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौशल्य सदस्य रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, खासदार नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव अविनाश आदिक, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौशल्य सदस्य मीना जगधने, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागप्रमुख अरुण कडू पाटील, राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते. यावेळी एमकेसीएलचे मार्गदर्शक विवेक सावंत यांना ‘ऍड. रावसाहेब शिंदे’ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

शरद पवार म्हणाले, ‘रावसाहेब शिंदे व माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. देशाचे कृषिमंत्री असताना अण्णासाहेब शिंदे यांनी कृषी क्षेत्रासाठी मोठे योगदान दिले आहे. समाजामध्ये काम करायचे असेल तर संघर्ष करायचा, अशी विकासाची दृष्टी असणारे हे लोक होते. रावसाहेब शिंदे यांनी अनेक वर्षे रयत शिक्षण संस्थेमध्ये काम केले आहे.’

संगणक क्षेत्रातील विवेक सावंत यांचा उल्लेख करताना खासदार शरद पवार म्हणाले, ‘एमकेसीएलच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी संगणक प्रशिक्षित झाले आहेत. साधारणतः आपल्याकडे उसाला 10 ते 12 कांडय़ा येतात. तोच ऊस एआय तंत्रज्ञानाचा वापर करून केल्यास त्या उसाला 22 ते 25 कांडय़ा येतात. तीस टक्के कमी पाणी आणि तीस टक्के कमी खर्चातून तीस टक्के जादा उत्पादन, हे ‘एआय’च्या माध्यमातून शक्य आहे. फक्त ऊसच नाही, तर इतर पिकांसह फळबागांनाही ‘एआय’चा फायदा होऊ शकतो. राज्याचे कृषिमंत्री, अर्थमंत्री यांच्यासोबत व्हीएसआयमध्ये बैठक घेऊन सरकारला एआय तंत्रज्ञानावर काम करायचे सुचवले आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतला आणि 500 कोटींची तरतूद या तंत्रज्ञानासाठी केली आहे. हे तंत्रज्ञान गेमचेंजर आहे. यासाठी जिह्यातील शेतकऱयांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी खासदार पवार यांनी केले.

यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार नीलेश लंके, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी आदींची भाषणे झाली.

यावेळी रयतचे शिक्षक, कर्मचारी, नेत्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. राजू शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रेरणा शिंदे यांनी स्वागत केले. डॉ. बाबूराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. रोहित शिंदे यांनी आभार मानले.