
गेल्या दोन महिन्यांपासून घरातच एका 40 वर्षीय दिव्यांग महिलेला चक्क साखळदंडाने बांधून ठेवल्याची संतापजनक घटना आज उघडकीस आली. विशेष म्हणजे, राजारामपुरी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या वसाहतीतील ही धक्कादायक माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, तसेच पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तत्परतेने धाव घेत त्या पीडितेची सुटका केली. उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. कोल्हापुरात या घटनेने खळबळ उडाली असून, संवेदनशील पोलीस अधिकाऱ्यांच्या तत्परतेचे सोशल मीडियातून कौतुक होत आहे. दरम्यान, महिलेचा भाऊ, भाचा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यासमोरच असलेल्या दौलतनगर परिसरात सारिका हनुमंत साळी ही महिला आपला भाऊ, भावाची पत्नी आणि भाचा यांच्यासह वास्तव्यास आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही महिला गतिमंद आणि दिव्यांग असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास देत असल्याचे कारण सांगत दोन महिन्यांपासून तिला साखळदंडाने बांधून ठेवले होते. खबऱ्यामार्फत ही माहिती पोलिसांना मिळताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर हे महिला पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. या महिलेला अंगभर साखळदंड बांधण्यात आले होते. शिवाय तीन कुलपेदेखील लावण्यात आली होती.
शिवसेना उपनेते संजय पवार यांचीही धाव
या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच शिवसेना पक्षाचे उपनेते व कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनीही पीडित महिलेचा भाचा अनिरुद्ध सूर्यकांत साळी याला चांगलेच सुनावले.