वरळी मेट्रो स्थानकातही गळती, तिकीट खिडकीजवळ लावाव्या लागल्या बादल्या

पहिल्याच पावसात सोमवारी भुयारी मेट्रोचे वरळीतील आचार्य अत्रे चौक स्थानक पाण्यात बुडाले. त्यापाठोपाठ आज झालेल्या पावसामध्ये वरळी स्थानकातही गळती सुरू झाली. चक्क तिकीट खिडकीजवळच पावसाच्या पाण्याच्या धारा लागल्या. त्यामुळे भुयारी मेट्रो स्थानकात पुन्हा तळे साचतेय की काय, या भीतीने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मेट्रोच्या कर्मचाऱयांना तिकीट खिडकीजवळ बादल्या लावून गळतीचे पाणी स्थानक परिसराबाहेर फेकावे लागले. या घटनेमुळे मेट्रो प्रशासनाने सुरक्षित प्रवासाबाबत केलेला दावा खोटा ठरला.

महायुती सरकारने ‘चमकोगिरी’साठी उद्घाटनाची घाई करून प्रवासी सेवेत उतरवलेल्या भुयारी मेट्रोच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दोन दिवसांपूर्वी आचार्य अत्रे चौक स्थानक पाण्याखाली गेले. तिथे अक्षरशः तळे साचले. त्याचा गाळ साफ करण्यात मेट्रो प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही, तोच बुधवारच्या पावसात वरळी मेट्रो स्थानकात तिकीट खिडकीजवळ गळती सुरू झाली. पावसाच्या पाण्याच्या धारा भुयारी स्थानक परिसरात कोसळताना पाहून प्रवाशांना ‘26 मे’ची पुनरावृत्ती होते की काय, याची धाकधूक वाटू लागली. गळतीचे पाणी बादल्या भरून स्थानकाबाहेर फेकण्याची नामुष्की मेट्रो कर्मचाऱयांवर ओढवली.

पुन्हा घिसाडघाईचा फटका

वरळी मेट्रो स्थानकातील गळती रोखण्याचे काम हाती घेतल्याचे मेट्रो प्रशासनाने जाहीर केले. याचवेळी आचार्य अत्रे चौक स्थानक प्रवासी सेवेत उतरवण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू असल्याचेही स्पष्ट केले. यावर मुंबईकरांनी जोरदार टीका केली. उद्घाटनाला केलेली घाई आमचा जीव धोक्यात घालणारी होती, असा टोला नियमित प्रवाशांनी सोशल मीडियातून हाणला.

भुयारी स्थानकांतील प्रवासी संख्येत घट

आचार्य अत्रे चौक स्थानकातील पाणी शिरल्याच्या घटनेनंतर मेट्रो प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मुसळधार पाऊस सुरू होताच प्रवासी मेट्रोकडे पाठ फिरवू लागले आहेत. तीन दिवसांत भुयारी मेट्रोच्या प्रवासी संख्येत घट झाल्याचे चित्र दिसले.