कुंभमेळ्यात पुन्हा अग्नितांडव; अनेक तंबू जळून खाक, 28 दिवसांत चौथी घटना; योगी सरकारचे व्यवस्थापन पुन्हा फेल

महाकुंभ मेळय़ात आज पुन्हा आगीने अक्षरशः तांडव घातले. आगीत अनेक तंबू जळून खाक झाले. सेक्टर 18 आणि 19 दरम्यान शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास चरित मानस सेवा प्रवचन मंडळाच्या तंबूत अचानक आग लागली. त्यामुळे भाविकांचा एकच आरडाओरडा आणि पळापळ सुरू झाली. भाविकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याने जीवितहानी टळली; परंतु आगीमुळे प्रचंड नुकसान झाल्याचे वृत्त आहे. मात्र 28 दिवसांत आगीची चौथी घटना घडल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे व्यवस्थापन पुन्हा एकदा फेल गेल्याचे समोर आले आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आगीची घटना घडताच घटनास्थळी भाविकांचीही मोठी गर्दी जमली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी पोहोचण्यासाठी उशीर झाल्याचे समोर आले. त्यामुळे आग भडकत गेली आणि मोठय़ा संख्येने तंबू पेटत गेले.

92 लाखांहून अधिक भाविकांचे पवित्र स्नान

महाकुंभाच्या आजच्या 34 व्या दिवशी 92 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले. पहाटेपासूनच संगम तटावर भाविकांची गंगेत डुबकी मारण्यासाठी गर्दी जमली, महाकुंभाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 50 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केल्याचे सरकारने म्हटले आहे. दरम्यान, गर्दीमुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ऑनलाइन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अग्निशमन दल हतबल

योगी सरकारने केलेल्या व्यवस्थापनानुसार तंबूपर्यंत जाणारे रस्ते छोटे आहेत. त्यामुळे आगीची घटना घडली तरीही त्या ठिकाणी तैनात असलेली अद्ययावत यंत्रणा घटनास्थळी पोहोचेपर्यंत प्रचंड शर्थीचे प्रयत्न करावे लागत असल्याचे समोर आले आहे.

कोंडीमुळे वाहनांना प्रवेश नाही

प्रचंड वाहतूककोंडी होत असल्यामुळे आणि भाविकांचा महासागर उसळल्याने वाहनांना दोन दिवस प्रवेश बंदच राहणार आहे. संगम रेल्वे स्टेशनही बंद ठेवण्यात आले असून भाविकांना या स्थानकापासून दूर 10 ते 12 किलोमीटर अंतरावर वाहने पार्क करण्यास सांगण्यात आले आहे.

नोटांनी भरलेल्या बॅगेची राख

श्रीराम चरित मानस सेवा प्रवचन मंडळाच्या तंबूत आग लागली तेव्हा तेथून सर्व भाविक बाहेर पडले होते. परंतु, येथील खुर्च्या, खाण्यापिण्याचे सामान आणि नोटांनी भरलरेल्या तीन बॅगा ठेवण्यात आल्या होत्या. यातील एक बॅग सुरक्षित आहे. मात्र, दोन बॅगा जळून खाक झाल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. आगीत कल्पवासींचे अन्नधान्य आणि इतर सामानाचीही राख झाली.

  • 19 जानेवारी रोजी सेक्टर 19 मधील गीता प्रेसच्या पॅम्पमध्ये आग लागली होती. या आगीत तब्बल 180 तंबू जळून खाक झाले होते.
  • 30 जानेवारीला सेक्टर 22 मध्ये आग लागली होती. या आगीत 15 तंबू जळाले.
  • 7 फेब्रुवारीला सेक्टर 18 मध्ये आग लागली. शंकराचार्य मार्गावर ही घटना घडली. यात 22 तंबूंची राख झाली होती.
  • आज 15 फेब्रुवारी रोजी सेक्टर 18 आणि 19 दरम्यान आग लागली. यात अनेक तंबू जळाले.

चेंगराचेंगरीतील मृतांचे आकडे लपवले – अखिलेश

मौनी अमावास्येच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची खरी संख्या यूपी सरकारने लपवली. अनेकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला, मात्र योगी सरकारने संपूर्ण माहिती दिली नाही. याशिवाय स्नानासाठी आलेल्या भाविकांचीही स्पष्ट आकडेवारी दिली जात नाही, असा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला.