टीम इंडिया दुबईच्या स्वारीवर रवाना! बांगलादेशविरुद्धच्या लढतीने करणार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मोहिमेला सुरुवात

घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धची मोहीम फत्ते केल्यानंतर मनोबल उंचावलेला हिंदुस्थानचा संघ बुधवारपासून सुरू होणाऱ्या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ क्रिकेट स्पर्धेसाठी शनिवारी मुंबईतून दुबईला रवाना झाला आहे. 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने हिंदुस्थान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.

टीम इंडियाचा संघ  विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असला, तरी जसप्रीत बुमराची अनुपस्थिती ही संघासाठी चिंतेचा विषय असेल. अनुभवी मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव यांच्या खांद्यावर गोलंदाजीची मोठी जबाबदारी असणार आहे.

फलंदाजीमध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांना फॉर्म गवसला असल्याने तसेच शुभमन गिल, श्रेयस अय्यर हे तुफानी फलंदाजी करत असल्याने हिंदुस्थानची फलंदाजी अधिक बळकट झाली आहे. त्यामुळे विजेतेपदाच्या शर्यतीत हिंदुस्थान हा बहुतांश जणांचा फेव्हरेट संघ ठरत आहे.

घरच्या मैदानावर हिंदुस्थानने इंग्लंडला टी-20 मालिकेत 4-1 ने मात दिल्यानंतर, एकदिवसीय मालिकेत देखील 3-0 ने व्हाईट वॉश देत लोळवले. त्यामुळे हिंदुस्थानी संघाचे मनोबल नक्कीच उंचावले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रंगीत तालीम पूर्ण झाल्याने एकही सराव सामना न खेळता हिंदुस्थानी संघ थेट 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

23 फेब्रुवारीला धमाका!

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 23 फेब्रुवारी रोजी हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा धमाका होणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले संघ हे रविवारी दुबईमध्ये मैदानात उतरणार आहेत. सुट्टीच्या दिवशीच या सामन्याचा थरार रंगणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीचा उत्साह आहे.

बक्षीस रकमेत घसघशीत वाढ!

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षिसाच्या रकमेत तब्बल 53 टक्क्यांनी घसघशीत वाढ करण्यात आली आहे. स्पर्धेत एपूण 60 लाख 90 हजार डॉलरचा म्हणजेच सुमारे 60 कोटी रुपयांचा वर्षाव केला जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला 20 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.