बुमराला कर्णधार करा; मदनलाल यांचा बीसीसीआयला सल्ला

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाच्या कसोटी नेतृत्वाची जबाबदारी जसप्रीत बुमराकडे सोपवावी, असा सल्ला माजी कसोटीपटू मदनलाल यांनी बीसीसीआयला दिला आहे. येत्या जून महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीनंतर हिंदुस्थानचा संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहितच्या निवृत्तीनंतर या मालिकेसाठी नव्या कर्णधारपदाच्या निवडीच्या चर्चेला  अक्षरशः उधाण आल्यामुळे संघाचा नवा नेता सलामीवीर असेल की गोलंदाज की यष्टिरक्षक याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

बुधवारीच रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्याची घोषणा केली. तेव्हापासून त्याच्या वारसदाराच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. याबाबत मदनलाल यांनी आपले परखड मत मांडले. ते म्हणाले, बुमरा जबरदस्त फॉर्मात आहे. तो संघातील स्थायी सदस्यही आहे. त्यामुळे त्याच्याच हातात संघात नेतृत्व सोपवावे. तसेच नव्या दमाच्या खेळाडूंना उपकर्णधार बनवले जाऊ शकते.

बुमराने केलेय नेतृत्व

बुमराने गेल्या अडीच वर्षांत तीन कसोटी सामन्यांत हिंदुस्थानचे नेतृत्व केले आहे. यापैकी एका सामन्यात विजय तर दोन सामन्यांत हार सहन करावी लागली होती. त्याने आधीच हिंदुस्थानी संघाचे उपकर्णधारपद भूषवले आहे. बुमराने 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत सर्वप्रथम नेतृत्व सांभाळले होते. तो सामना हिंदुस्थान सात विकेटनी हरला होता.  त्यानंतर गेल्या वर्षी पर्थ कसोटीत त्याने पुन्हा नेतृत्व स्वीकारले. ज्यात हिंदुस्थानने 295 धावांनी संस्मरणीय विजय मिळवला होता. या मालिकेत हिंदुस्थान 1-2 ने पिछाडीवर असताना सिडनीत बुमराकडे पुन्हा नेतृत्व सोपविण्यात आले होते. या कसोटीत हिंदुस्थानला दुहेरी धक्का बसला होता. हिंदुस्थानने ही मालिका 1-3 ने गमावली आणि जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या शर्यतीतून बादही झाला.