नालेसफाईत दिरंगाई केली तर बिले मंजूर करणार नाही, केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांचा ठेकेदारांना इशारा

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात विविध प्रभागात सुरू असलेल्या नाल्याची आणि गटारांची सफाई कामे 31 मेपूर्वी पूर्ण करा असे सांगतानाच ही कामे निविदेतील अटी-शर्तीचे पालन न करता केली तर बिले मंजूर करणार नाही असा स्पष्ट इशारा महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी ठेकेदारांना दिला.

पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची योग्य सफाई व्हावी यासाठी आयुक्त गोयल स्वतः स्पॉट व्हिजीट करत आहेत. त्यांनी ‘जे’, ‘आय’, ‘ड’ आणि ‘ह’ प्रभागातील नालेसफाईची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता घनश्याम नवंगुळ, ‘ह’ प्रभाग अधिकारी चंद्रकांत जगताप उपस्थित होते.

गाळ, कचरा दोन दिवसांत उचला !
नाल्यातून काढलेला गाळ आणि कचरा सुकल्यानंतर दोन ते तीन दिवसांत उचला अशा सक्त सूचना आयुक्त गोयल यांनी ठेकेदारांना दिल्या. साफसफाईसाठी यांत्रिक पद्धतीचा वापर करा आणि कामाला गती द्या, असे सांगतानाच शहरात फिरून पुन्हा एकदा पाहणी करणार असल्याचे त्यांनी ठेकेदारांना सांगितले.