
राज्यात कायद्यानुसार गोवंश हत्या बंदी आहे. या कायद्याचा आधार घेऊन राज्यातील गुरांचे बाजार बंद करण्याचे पत्र गोसेवा आयोगाने जारी केले होते. ईदच्याच कालावधीत ही बंदी घातली गेल्याने मुस्लिम समाजाने त्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शासनमान्य आयोगाने काढलेले हे वादग्रस्त पत्र मागे घेण्याची नामुष्की महायुती सरकारवर आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोसेवा आयोगाचे पत्र मागे घेतल्याची माहिती दिली. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 3 जून ते 8 जून दरम्यान राज्यातील गुरांचे बाजार बंद ठेवावेत असे आदेश या पत्राद्वारे आयोगाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिले होते. त्यामुळे ईदसाठी कुर्बानीची परंपरा राखण्यासाठी बकरी मिळणे कठीण झाले होते.
ईद सणानिमित्त कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत मुस्लिम समाजातील आमदारांनी गोसेवा आयोगाचे पत्र मागे घ्यावे अशी विनंती केली होती. तसेच गोवंशाच्या नावाखाली काही संघटना बिगर गोवंश जनावरांच्या वाहतुकीला अडथळे आणतात, हप्ते घेतात, वाहन चालकांना मारहाण करतात. अशी बेकायदेशीर कामे करणाऱ्या घटकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही केली.