
>> दिलीप देशपांडे, [email protected]
गेल्या काही दशकांपासून प्लॅस्टिक प्रदूषण जगाच्या कानाकोपऱ्यात शिरले आहे. आपण पितो त्या पाण्यात, अन्नात आणि आपल्या शरीरातही ते शिरत आहे. प्लॅस्टिक प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे आणि आजच्या पर्यावरणीय आव्हानांपैकी एक आहे, अर्थात त्यावर काही स्पष्ट उपाय उपलब्ध आहेत. त्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून अशा या घातक प्रदूषणाकडे लक्ष देऊन प्लॅस्टिकचा वापर बंद करणे आवश्यक आहे. शासनाची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच आपलीही आहे.
या वर्षी जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना प्लॅस्टिक ‘प्रदूषणाशी लढा’ अशी आहे. त्यादृष्टीने आपण करीत असलेला हानीकारक प्लॅस्टिक वस्तूंचा वापर प्रामुख्याने थांबवणे आणि त्यावर कडक स्वरूपाचे बंधने आणणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. आपण सर्वच नागरिकांनी याचा गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे.
आपल्याला स्वस्त, निरोगी आणि प्रदूषणमुक्त आयुष्य जगायचे असेल तर आजूबाजूचे पर्यावरण नेहमी स्वच्छ असणे आणि स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने दरवर्षी प्रयत्न केले जातात. शासकीय तसेच प्रशासकीय पातळीवर दिवस साजरा होतोच. मात्र एक प्रश्न मनात येतोच की, असे दिवस साजरे करून पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे का?
खरं म्हणजे पर्यावरण आणि प्रदूषण यांचा खूप जवळचा संबंध आहे. अनेकविध प्रकारच्या प्रदूषणांमुळे पर्यावरणाचा ऱहास प्रामुख्याने होत असतो. निसर्गनिर्मित कारणांमुळे होणाऱया ऱहासावर आपण काय करणार? ती एक प्रकारची आपत्तीच असते, पण आपल्याकडून ज्या ज्या कारणांमुळे प्रदूषण निर्मिती होते ती आपण नक्कीच कमी करू शकतो.
पृथ्वीवरील जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण होणे महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचा ऱहास अनेक प्रकारच्या प्रदूषणाने होतो. प्रदूषण कोणत्या मार्गाने कसे होते आणि कोणामुळे होते यावर नियंत्रण हवे. वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, जुनी इलेक्ट्रिक उपकरणे, प्लॅस्टिक कचरा, वातावरणातील बदलाने होणारे प्रदूषण असे अनेक घटक प्रदूषणाला कारणीभूत आहेत.
गेल्या काही दशकांपासून प्लॅस्टिक प्रदूषण जगाच्या कानाकोपऱयात शिरले आहे. आपण पितो त्या पाण्यात, अन्नात आणि आपल्या शरीरातही ते शिरत आहे. प्लॅस्टिक प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे आणि आजच्या पर्यावरणीय आव्हानांपैकी एक आहे, अर्थात त्यावर काही स्पष्ट उपाय उपलब्ध आहेत. त्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.
दैनंदिन जीवनात आपण भाजीपाला, किराणा वस्तू, दूध, कपडा, कुल्फी, आइस्क्रीम गाडीवर, पुस्तकाच्या दुकानात, प्रवासात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर अगदी सहजपणे करत असतो. मग त्या पिशव्यांची जाडी किती मायक्रॉनची आहे हे पाहायला कोणालाही वेळ नसतो. कारण जीवन गतिमान झाले आहे. तसेच फ्रिजमधल्या बाटल्या. प्रवासात आपण घेतो त्या पाण्याच्या बाटल्या हे सर्व वापरतो आणि त्यानंतर ते अगदी सहजपणे कचऱयात टाकतो. कचऱयापासून तर विषारी वायू निर्माण होतोच, पण अन्नाबरोबरच त्या पिशव्याही जनावरे खातात आणि दरवर्षी मोठे पशुधन नष्ट होते.
देवस्थान, पर्यटनस्थळे, मोठमोठी हॉस्पिटल्स यास कारणीभूत ठरतात. अनेक प्रकारच्या प्लॅस्टिकच्या वस्तूंचे विघटन होत नसते. मोठय़ा शहरांच्या बाहेर जे कचरा डेपो असतात, तिथे प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिकच्या वस्तूंचा खच पडलेला असतो. तसेच बऱयाच वेळा पाण्याचे स्रोत असतात त्या ठिकाणी या वस्तू टाकल्या जातात. मग ते पाणी दूषित होते आणि प्रदूषण होते. आपल्या देशामध्ये फार मोठय़ा प्रमाणावर प्लॅस्टिक निर्मिती होत आहे. हजारो युनिटमध्ये लाखो लोकांचा रोजगार त्यात गुंतला आहे. त्यामुळेच या गोष्टीकडे दुर्लक्ष होते असेही म्हणावे लागेल. आता तर सिंगल प्लॅस्टिक वापरास बंदी करण्यात आली आहे. प्लॅस्टिकचे कप, ग्लास, प्लॅस्टिकचे चमचे, केक कापण्यासाठी वापरात येणारी सुरी, चॉकलेट आइस्क्रीमसाठी वापरण्यात येणाऱया कांडय़ा, सजावटीसाठी वापरण्यात येणारे पॉलिस्ट्रिन, मिठाईसाठी वापरण्यात प्लॅस्टिकचे डबे, 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या या सर्व वस्तूंचा त्यात समावेश आहे. तेव्हा प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून अशा या घातक प्रदूषणाकडे लक्ष देऊन प्लॅस्टिकचा वापर बंद करणे आवश्यक आहे. शासनाची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच आपलीही आहे.
निसर्गातील अर्थातच वातावरणातील बदलाचा पर्यावरणाचा समतोल ढासळण्यावर मोठा परिणाम होतो. निसर्गातील वादळ, पावसाने हजारो वृक्ष उन्मळून पडतात. आपणही शहराच्या सुशोभनासाठी, वाहतूक मार्गासाठी हजारो वृक्षांची कत्तल करतो. एकीकडे दिखाऊ वृक्षारोपण कार्यक्रम राबवतो. वृक्ष नष्ट झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढळतो.
मानवनिर्मित कारणांनी प्रदूषण वाढून पर्यावरणाचा समतोल ढळत आहे. ती आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याला आपणच पायबंद घालायला हवा. प्रत्येकाने मनावर घेतले तर सहज शक्य आहे, पण तेच होत नाही. अनेक अभियान राबवले जात आहेत, जसे प्लॅस्टिक पिशवी मुक्ती अभियान, स्वच्छता अभियान. मात्र ती अधिक कडकपणे राबवायला हवीत. अजून बाजारपेठेत पिशव्या सापडतात, रस्त्यावर थुंकणाऱ्यांचे प्रमाण कमी होत नाही. प्रदूषण नियंत्रण महामंडळ, गावोगावच्या ग्रामपंचायती,नगरपालिका, महानगरपालिका यांनी तसेच अभियानांची जबाबदारी असलेल्यांनी आपले कर्तव्य, जबाबदारी पार पाडली तर प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण शक्य आहे.
प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला परिसर स्वच्छ ठेवला आणि वृक्षारोपण करण्याकडे लक्ष दिले, वृक्षतोड थांबवली तर पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. आपण सारेच वसुंधरेचे सेवक आहोत याचे भान ठेवायला हवे. आपण कितीही प्रगती केली तरी निसर्गाची ताकद अफाट आहे याची प्रचीती आपल्याला येतच असते. त्यामुळे पर्यावरण संवर्धन किंवा संरक्षण हा एक दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम नसून आपली एक कायमची बांधिलकी आहे.