
पिंडदान करताना तोल जाऊन नदीत पडल्याने तीन महिलांचा बुडून मृत्यू झाला. गोंदिया तालुक्यातील रजेगावजवळ बाघ नदीच्या करोणी घाटावर ही घटना घडली. समिता टेंभरे, मिनाक्षी बघेले आणि मीराबाई तुरकर अशी मयत महिलांची नावे आहेत. तिनही महिला नागपूर शहराजवळील हिंगणा येथील रहिवासी असून बाघ नदीवर नातेवाईकाच्या पिंडदानासाठी आल्या होत्या.
पिंडदान करताना समिता टेंभरे या महिलेचा पाय घसरला आणि त्या पाण्यात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी मिनाक्षी आणि मीराबाई यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र कुणालाही पोहत येत नसल्याने तिघीही नदीत बुडाल्या. आरडाओरडा ऐकून आसपासच्या लोकांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने शोध मोहिम राबवत तिनही मृतदेह बाहेर काढले. रावणवाडी पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.