
घोषित आणीबाणी आणि अघोषित आणीबाणी यात फरक असतो. हा फरक काय आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. पुन्हा सावध राहण्याचा काळ आला आहे, असे परखड मत मांडतानाच आम्ही काय वाट्टेल ती किंमत देऊ, पण संसदीय लोकशाहीचा देश अखंड राहील, हा दृष्टिकोण पुढे घेऊन उभे राहू, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.
आज बातमीतील मत सरकारच्या विरोधी असेल तर त्या वृत्तपत्राला, त्या पत्रकाराला सरकारच्या मुख्यालयातून पह्न येतात. ही बातमी अशी छापू नका. विरोधात बातमी लावायचीच असेल आणि नंतर काही झाले तर आमच्याकडे येऊ नका, अशी धमकी दिली जाते, असे शरद पवार म्हणाले.
आणीबाणी लावली. इंदिरा गांधी यांना दोष दिला गेला. हे सर्व खरे आहे. पण पराभव झाल्यावर इंदिरा गांधी यांनी देशाची क्षमा मागितली ही गोष्ट विसरता कामा नये. नंतर पुन्हा जनतेने त्यांना संधी दिली. देशातील चित्रही बदललं.
आणीबाणीला बाळासाहेब देवरसांचे समर्थन होते
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीचे समर्थन केले होते. तसेच जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाशी आरएसएसचा संबंध नाही, असेही त्यांनी जाहीर केले होते. भाजपाला बाळासाहेब देवरसांची भूमिका मान्य नाही का, असा सवाल काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.