
जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा शुक्रवारपासून सुरू होत आहे. या रथयात्रेसाठी देश-परदेशातून अनेक भाविक येतात. सुभद्रा, जगन्नाथ आणि बलभद्र यांची नगरप्रदक्षिणेलाच रथयात्रा म्हटले जाते. रथयात्रेपूर्वी यात्रा निघणाऱ्या मार्गाची सोन्याच्या झाडून स्वच्छता केली जाते. यामागे काही पैराणिक मान्यता आहेत. सोने हा एक पवित्र धातू मानला जातो. त्यामुळे सोन्याला देव-देवतांच्या पूजेमध्ये विशेष स्थान आहे. यात्रा सुरू होण्यापूर्वी, वैदिक मंत्रांच्या उच्चारात तिन्ही रथांचा मार्ग सोन्याच्या झाडूने स्वच्छ केला जातो.
जगन्नाथ रथयात्रेचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. दरवर्षी आषाढ शुक्ल द्वितीय तिथीच्या दिवशी ओडिशातील पुरी येथे ही भव्य रथयात्रा काढली जाते. यावर्षी भगवान जगन्नाथांची रथयात्रा शुक्रवारपासून सुरू होत आहे. या यात्रेत भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा रथावर स्वार होऊन शहराचा दौरा करतात. या शुभ प्रसंगी लाखो भाविक पुरी येथे येतात आणि रथ ओढण्याचा सौभाग्य मिळवतात. असे मानले जाते की या यात्रेत सहभागी होऊन रथ ओढल्याने जीवनातील सर्व पापांचा नाश होतो.
या यात्रेशी संबंधित अनेक अनोख्या प्रथा शतकानुशतके चालत आल्या आहेत. त्यापैकी सोनेरी झाडूने मार्ग स्वच्छ करणे ही सर्वात खास प्रथा आहे. या विधीला ‘छेरा पहारा’ म्हणतात. भगवान जगन्नाथ आणि त्यांच्या भावंडांचा रथ ज्या रस्त्यांवरून जातो ते सोनेरी झाडूने स्वच्छ केले जातात. या कृतीतून भक्त भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्याबद्दल कृतज्ञता आणि भक्ती व्यक्त करतात.
सोने केवळ आध्यात्मिक शुद्धतेचे प्रतीक नाही तर देवाचे स्वागत करण्यात काहीही कमी पडू नये अशी भावना देखील दर्शवते. या परंपरेमुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. या झाडूचा वापर फक्त राजांच्या वंशजांकडूनच केला जातो. सोनेरी झाडूने मार्ग स्वच्छ करण्याचा उद्देश परमेश्वराचा मार्ग शुद्ध आणि पवित्र करणे आहे. एका कथेनुसार देवी सुभद्रा यांनी पुरी शहर पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर भगवान जगन्नाथ आणि बलभद्र यांनी तिला रथावर बसवून नगरभ्रमणासाठी बाहेर पडले आणि वाटेत त्यांच्या मामी गुंडीचाच्या मंदिरात काही दिवस राहिले. तेव्हापासून या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी रथयात्रा काढली जाते. तिन्ही रथ गुंडीचा मंदिरात जातात आणि तेथे सात दिवस विश्रांती घेतात. त्यानंतर ते पुन्हा परतीचा प्रवास सुरू करतात. या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी देश-परदेशातून अनेक भाविक येतात.