Jagannath Rath Yatra tragedy – पुरीतील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, 3 भाविकांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

ओडिशातील पुरी येथे श्री जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. गुंडीचा मंदिराजवळ झालेल्या या चेंगराचेंगरीत 3 भाविकांचा मृत्यू झाला. यात दोन महिलांचा समावेश आहे. अनेक भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी पहाटे 4.30 च्या सुमारास ही घटना घडली.

भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी शुभद्रा यांच्या मूर्ती असलेले तीन रथ जगन्नाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री गुंडीचा मंदिराजवळून जात असताना रविवारी पहाटे चेंगराचेंगरी झाली. मंदिराजवळ पवित्र रथाचे आगमन झाल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली. यावेळी झालेल्या रेटीरेटी दरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि यात तिघांचा मृत्यू झाला, तर 50 हून अधिक जखमी झाले.

मृतांमध्ये दोन महिलांचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे. प्रभाती दास, बसंती साहू आणि प्रेमकांत मोहंती अशी मृतांची नावे आहेत. तिघेही ओडिशातील खुर्दा जिल्ह्यातील रहिवासी असून श्री जगन्नाथ रथयात्रेसाठी पुरी येथे आले होते.

जगन्नाथ यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. सुट्टीचा दिवस असल्याने दर्शनासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. ओडिशासह देशभरातली कानाकोपऱ्यातून भाविकांनी पुरी येथे गर्दी केली आहे. याच दरम्यान ही घटना घडली. ही घटना घडली तेव्हा गर्दी नियंत्रणासाठी पुरेशी व्यवस्थाही नव्हती असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले.

दरम्यान, ही घटना घडली तेव्हा कुणीही प्रतिसाद दिला नाही. अग्निशमन दल, बचाव पथक आणि रुग्णालयानेही प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती चेंगराचेंगरीत पत्नी गमावल्याने व्यक्तीने दिली. तसेच ही एक दयनीय घटना असून याचे वर्णन शब्दात करता येणार नाही, असेही तो भरल्या डोळ्याने म्हणाला.