झाडाला गळफास घेऊन वारकऱ्याने आयुष्य संपवले

नगर तालुक्यातील राईछत्तिसी गावच्या शिवारात शेतातील कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन एका वारकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (30 जून) सकाळी उघडकीस आली. सुखदेव लक्ष्मण रावे (वय 62, रा. मिसळवाडी, बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्या वारकऱ्याचे नाव आहे.

सुखदेव राणे यांचा केसकर्तनाचा व्यवसाय असून, ते दरवर्षी पंढरपूरची वारी करत होते. या वर्षी ते गावाहून आळंदी येथे गेले. तेथून दिंडीत सहभागी झाले. दिंडीचा मुक्काम नातेपुते येथे असताना त्यांनी एसटी बसने पंढरपूर गाठले. श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते पुन्हा एसटी बसने गावाकडे जात होते. मात्र, 29 जून रोजी सायंकाळी ते रुईछत्तिशी गावाजवळ उतरले होते. त्यानंतर 30 जून रोजी सकाळी धर्माअण्णा गोरे यांच्या शेतात कडूनिंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी रावे यांना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे.