ललित- या फुलांच्या गंधकोषी.

>> डॉ. अंजुषा पाटील

चराचरात व्यापलेल्या परमात्म्यासारखा कुठल्याच खुणा न ठेवणारा फुलांचा सुगंध. या गंधाचं आपल्या प्रत्येकाशी नातं आहे.

गंध फुलांचा गेला सांगून

 तुझे नि माझे व्हावे मिलन…

व्हावे मिलन…

फूल म्हटलं की त्याचा गंध आलाच. गंध, सुगंध मनाला मोहित करतो. फूल हे प्रेमाचे प्रतीक आहे आणि सुगंध ही प्रेमाची हृदयाशी रेशीमगाठ हळुवार बांधत असते. प्रेम हे तरल असते. हे प्रेम सुगंधाप्रमाणे प्रेमवीरांना वाऱयाच्या लहरीप्रमाणे जणू झुलवत असते. एकमेकांच्या नजरा फक्त एकमेकांशीच हसत असतात. कारण त्या दोघांना आणखी कोणी दिसतच नसतं. असे हे खोडकर, हळुवार, भटकं, नेटकं, चंचल प्रेम असते. त्याचे फुलाशी आणि फुलाच्या गंधाशी जवळचे नाते असते.

फुलं ही सगळ्यांनाच आवडतात. ती सुंदर नाजूक अशी देवाची निर्मिती असते. काही फुलांची सहज नावं घेतली तरी फुलांचा  दरवळ नाकाजवळ येतो आणि मराठी गाणी ओठावर येतात. इतकं आपलं जीवन या फुलांनी फुलांच्या गंधाने व्यापून गेलेलं आहे.

त्या फुलांच्या गंधकोषी

सांग तू आहेस का? 

परमेश्वराचे अस्तित्व फुलांच्या गंधकोषी असते. कारण त्या विश्वाची निर्मितीच त्याने केलेली आहे. त्याच्या इच्छेशिवाय आपण श्वास घेऊ शकत नाही. तरीही प्रत्येक माणसाला वाटते की, मी हे केले मी, ते केले किंवा मी काहीतरी करू शकतो. ही सृष्टी त्या जगन्नियंत्याने बनवली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आज प्रगत झालेलं आहे. तरी माणूस जन्म आणि मृत्यू यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. याचा अर्थ त्या परमात्म्याचे अस्तित्व आहे आणि ते अबाधित आहे.

प्रीतीचा पारिजात फुलला

सुगंध त्याचा तुझा नि माझा

हृदयी दरवळला… 

प्रेमाचे जेवढे रंग तेवढे गंध. प्रेमात त्याग, सर्वस्व अर्पण करण्याची ताकद असते. जेवढे प्रेम उदात्त, तरल तेवढं त्याचं फुलणं सहजगत्या असते. अशा प्रीतीच्या पारिजातकाचा हळुवार सुगंध संपूर्ण सृष्टीला मंत्रमुग्ध करतो. तुझ्या माझ्या हृदयाची खूण असते ती. ती संवेदनशील मनावर हृदयावर नैसर्गिक फुंकर घालते. आणि तो सुगंध कायम दरवळत राहतो. कृ. बा. निकुंब यांची काळजाला भिडणारी ही कविता.

वाऱयावरती गंध पसरला नाते मनाचे

मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे

जल्लोष आहे आता उधाणलेला

स्वर धुंद झाला… 

या सृष्टीत किती गंध आहेत याला सीमा नाही. माणसाच्या नात्यालाही एक प्रेमळ सुगंध असतो. तो आयुष्यभर सहवासाने, एकमेकांच्या भावनांच्या आविष्काराने अधिक सुगंधित होतो आणि दरवळत राहतो.

असा हा गंधाचा महिमा. कधीही न संपणारा.

गंध हा श्वास हा, स्पर्श हा सांगतो

तूच तो, तूच तो, तूच तो!

एक सुगंध अनेकांना वेगवेगळा भासतो. त्या सुगंधाबरोबरच्या भावना, आठवणी, प्रसंग आणि व्यक्ती यांचा सहसंबंध आपोआप जोडला जातो. आणि मग त्याची ओळख पटते.

मोगरा, पारिजात, कोरंटी, जाई, जुई, चाफा, केतकी, रातराणी, बकुळी, गुलाब, शेवंती, चंपा, चमेली, अबोली, निशिगंध, सायली आणि गुलमोहर  यांचा गंध वाऱयाबरोबर पसरतो. कधी कधी ओळखता येत नाही. चार माणसं आनंदाच्या क्षणी एकत्र जमली की, गाण्याच्या भेंडय़ा लावण्याचा मोह सर्वांनाच होतो. काही वेळा विशिष्ट शब्दांवरून किंवा वस्तूंवरून गाणी म्हटली जातात. फूल ही थीम ठेवली तर अनेक गाणी आपल्या ओठावर रेंगाळतात. शाळेतल्या कवितासुद्धा आठवत राहतात. त्या गाण्याची गोडी, अर्थ, गेयता आणि संदेश मनापर्यंत पोहोचतो.

अशाप्रकारे फुलांचं आणि गंधाचं प्रत्येक माणसाशी नातं आहे. गरज आहे डोळे आणि नाक उघडे ठेवून त्या फुलांच्या गंधकोषी असलेल्या सौंदर्याचा आस्वाद घेण्याची. मग आपणच जणू फूल बनून नाचू लागतो, मनातल्या मनात.

मी आज फूल झाले

जणू कालच्या कळीला

लावण्यरूप आले

सोन्याहुनी सतेज ही भासते सकाळ

किरणातुनी रवि हा फेकीत इंद्रजाल

मी बावरी खुळी गं,

या सावलीस भ्याले

मी आज फूल झाले…