निवडणूक आयोगाचाच निष्पक्ष:निवडणूकांमध्ये खरा अडथळा; सीसीटीव्ही फुटेज व डेटा का लपवला? प्रश्न विचारत आदित्य ठाकरे यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी निवडणूकांमध्ये कशा प्रकारे मतचोरी झाली याबाबत संपूर्ण जगासमोर पर्दाफाश केला. मीडियासमोर पॉइंट टू पॉइंट ‘पॉवर’फुल प्रेझेंटेशन सादर करत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरोधातील पुराव्यांचा ढिगच मीडियासमोर ठेवला. त्यावरुन सध्या निवडणूक आयोगावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. आज शुक्रवारी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला.

”जर आपण खरंच लोकशाही असलेला देश असू तर निवडणूक आयोगाने सांगावं की विरोधकांनी मागितलेला निवडणूकीचा डेटा व सीसीटीव्ही फुटेज का दिले नाही. त्यांचे लोकशाही विरोधी कामाचा काल पर्दाफाश झाला आहे. निवडणूक आयोगाचाच निष्पक्ष:निवडणूकांमध्ये खरा अडथळा आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

आदित्य ठाकरे यांचे गुरुवारचे ट्विट

”’तुम्ही कोणत्याही विचारसरणीचे असलात तरी जर तुम्ही देशभक्त असाल तर राहुल गांधींचा निवडणूक आयोगाचा पर्दाफाश करणारा व्हिडीओ पाहाच. आम्ही खूप आधीपासून सांगत आलोय की इलेक्शन कमिशनने गेल्या काही वर्षात देशात निष्पक्ष: व मुक्त निवडणूका घेतलेल्या नाहीत. आपल्या देशात लोकशाही असल्याचे आपण भासवतो पण प्रत्यक्षात तसं दिसत नाही. राहुल गांधी यांनी आज मुद्देसूद मांडणी करत पुरावे सादर करत पूर्ण पारदर्शकतेने निवडणूक आयोगाचा पर्दाफाश केला आहे. आता निवडणूक आयोगाने राहुल गांधींसोबत एका स्टेजवर उभं राहून त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यावी. किंवा मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने (ECI) त्यांचे नाव एंटायरली कॉम्प्रमाईज्ड कमिशन असे ठेवावे. हा सर्व प्रकार फक्त निवडणूकांसाठी नाही तर हे सर्व देशासाठी आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.