Ratnagiri News – शिवसेना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर; तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली शिवसेना चिपळूण तालुका संघटनेने आज शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शन करून निवेदन सादर केले. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी ₹५०,०००/- थेट आर्थिक मदत जाहीर करावी, नैसर्गिक आपत्तीपूर्व नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

या निदर्शनाचे नेतृत्व शिवसेना चिपळूण तालुकाप्रमुख बळीराम गुजर यांनी केले. राज्यातील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे आणि पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सरकारकडून योग्य मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे. त्यामुळे शिवसेनेने राज्य सरकारकडे तातडीने अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी ₹५०,०००/- थेट आर्थिक मदत जाहीर करावी आणि नैसर्गिक आपत्तीपूर्व नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, या मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे.

पिकविमा योजना सुलभ करून, विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. अतिवृष्टीमुळे घरे आणि पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना पुरेसा मोबदला द्यावा. जनतेसाठी बंद करण्यात आलेला ‘आनंदाचा शिधा’ तातडीने सुरू करावा. राज्यातील महिलांना दिलेल्या वचनाप्रमाणे ₹२,१००/- ची आर्थिक मदत त्यांच्या खात्यात जमा करावी. ही मागणीपत्रे शिवसेना चिपळूण तालुक्याच्या वतीने तहसीलदार मा. प्रवीण लोकरे यांना देण्यात आली. त्यांनी सर्व मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि शासनाकडे पाठपुरावा करण्याचे १००% आश्वासन दिले. तसेच, चिपळूण तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल तातडीने शासनाकडे पाठविण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या वागण्यातून आणि संवादातून एक संवेदनशील प्रशासकीय दृष्टिकोन प्रकट झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांबाबतची त्यांची सहानुभूती स्पष्ट झाली आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली.

निदर्शनाच्या प्रसंगी तालुका समन्वयक सुधीर भाऊ शिंदे, तालुका संपर्क संघटक अशोकराव नलावडे, महिला माजी सभापती व उपजिल्हा संघटिका धनश्री शिंदे, ऐश्वर्या घोसाळकर, उपतालुका प्रमुख राजाभाऊ नारकर, सचिन शेट्ये, संदीप राणे, उपशहर प्रमुख राजन खेडेकर, विभागप्रमुख सागर सावंत, शशिकांत शिंदे, मनोज पांचाळ, उपविभाग प्रमुख मंगेश कोकीरकर, फैय्याज शिरळकर, तालुका प्रसिद्धीप्रमुख सचिन चोरगे, युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते, शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, उपशहर प्रमुख आकाश कदम, ओंकार गायकवाड, विभाग प्रमुख अथर्व चव्हाण, शाखाप्रमुख राहुल गुरव, जियाद चिकटे, रोहन पवार यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित राहिले.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले की, शेतकऱ्यांचा प्रश्न फक्त कृषीचा नाही, तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, आणि बळीराजाला न्याय मिळवूनच राहणार आहे. या आंदोलनाद्वारे चिपळूणमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा जनआवाज घुमला आणि शासनासमोर बळीराजाच्या न्यायासाठीचा मुद्दा ठामपणे उभा राहिला.