
ज्येष्ठ कादंबरीकार आणि 39 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबू बिरादार यांचे मंगळवारी सकाळी देगलूर येथे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. गेल्या दीड वर्षापासून ते फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी देगलूरजवळील मंगाजीवाडी (धनगरवाडी) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबू बिरादार यांच्या पश्चात पत्नी, 4 मुले, 4 मुली, नातवंडे असा परिवार आहे.
‘कावड’, ‘मातीखालचे पाय’, ‘गोसावी’, ‘अग्निकाष्ठ’, ‘अंतःपुरुष’, ‘संभूती’ आणि ‘आदिवास’ आदी कादंबऱ्यांचे लिखाण त्यांनी केले. त्यांची ‘मातीखालचे पाय’ ही कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत एम. ए. मराठीच्या अभ्यासक्रमाला तर ‘कावड’ ही कादंबरी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत अभ्यासक्रमात आहे. तेलंगणाच्या सीमेवरील देगलूर तालुक्यातील काठेवाडीचा त्यांचा जन्म असल्यामुळे त्यांच्या लेखनात मराठवाडा व तेलंगणा-आंध्र प्रदेशातील संस्कृती, परंपरा व ग्रामीण जीवन, ग्रामीण प्रश्नाचे प्रतिबिंब दिसायचे. त्यांना ‘महाराष्ट्र राज्य पुरस्कार’, ‘बी. रघुनाथ’, ‘यशवंतराव स्मृती साहित्य’, ‘श्री विद्या’, ‘संजीवनी’, ‘सौ. सुभद्रा सेवाभावी’, ‘कविवर्य ना. धों. महानोर’, ‘गुणीजन साहित्य संमेलन’ आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.






























































