
राज्यात सध्या गुंडगिरी व दडपशाही मोठय़ा प्रमाणावर सुरू असून, सत्ताधारी भाजपकडून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप ही विरोधकांची नेते खाणारी चेटकीण असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
यावेळी खासदार नीलेश लंके, काँग्रेसचे शहराध्यक्ष दीप चव्हाण, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर, शरद आहेर, नीलेश मालपाणी, संजय झिंजे, बाळासाहेब भंडारी, फिरोज खान आदी उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले, ‘भाजप सत्ताधाऱयांची गुंडगिरी राज्यात खुलेआम सुरू आहे. आजही विरोधकांना प्रचार करण्यासाठी मैदान उपलब्ध करून दिले जात नाही. फक्त फोडाफोडी करणे आणि खोटे आरोप करणे, हाच भाजपचा धंदा सुरू आहे. भाजपकडे आता निष्ठावंत पदाधिकारी उरलेले नाहीत, त्यामुळेच ते काँग्रेस व इतर विरोधी पक्षांची माणसे व नेते पळवून नेत आहेत, असे सांगत भाजप विरोधकांची नेते खाणारी ‘चेटकीण’ आहे,’ असा हल्लाबोल त्यांनी केला.
‘पुसून टाका’ हाच भाजपचा अजेंडा
भाजप बेताल वक्तव्य करण्यातही मागे नाही. ‘पुसून टाका’ हा त्यांचा अजेंडा झाला आहे. दोन शिवसेना व दोन राष्ट्रवादी तयार करून त्यांनी हेच सिद्ध केले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाच्या योजना बंद करण्याच्या मार्गावर असून, लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांच्याकडेही भाजपने दुर्लक्ष केले आहे. आरएसएसच्या कार्यालयांमध्ये फक्त मोदी आणि अमित शहा यांचेच फोटो लावण्याचा अजेंडा असून, याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साथ देत असल्याची टीकाही सपकाळ यांनी केली.
निवडणूक आयोगाची पक्षपाती भूमिका
यंदाच्या निवडणुकीत गुंडगिरी मोठय़ा प्रमाणावर वाढली असून, बंदुका व कोयत्यांच्या जोरावर दहशत निर्माण केली जात आहे. सोलापूर, खोपोली आणि अकोट येथे तिघांची हत्या झाली असतानाही सरकारला त्याचे गांभीर्य नाही. निवडणूक आयोगही पक्षपाती भूमिका घेत असून, निष्पक्ष निवडणुका होणार नाहीत. आमच्या हालचालींवर पाळत ठेवली जाते. सरकारच्या माध्यमातून हेरगिरी सुरू असून, ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब आहे, असा आरोपही सपकाळ यांनी केला.
एकमेकांत वाद वाढवून विकासाचे प्रश्न केले गायब
‘महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांमध्ये रस्ते, वीज, पाणी हे मूलभूत प्रश्न महत्त्वाचे असतानाही सरकारला विकासकामांशी काहीही देणेघेणे नाही. मराठी-उर्दू, महाराष्ट्रीयन-उत्तर प्रदेशी असे वादग्रस्त मुद्दे उभे करून विकासाचे प्रश्न गायब करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे सपकाळ म्हणाले. राज्यातील सत्ताधारी पक्ष सध्या ‘नुरा कुस्ती’ खेळत असून, एकमेकांवर टीका करत असल्याचे चित्र संशयास्पद आहे. एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा भाजपने या दोघांना सत्तेतून बाहेर काढावे किंवा त्यांनी स्वतः सत्तेतून बाहेर पडावे, मगच टीका करण्याचा अधिकार राहील,’ असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.































































