आदित्य ठाकरे यांचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र, मुंबईसह महाराष्ट्रातील ‘या’ गंभीर मुद्द्याकडे वेधले लक्ष

मुंबईसह महाराष्ट्रातील वाढत्या हवा प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनासंबंधी आजार जडत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हवेची गुणवत्ता ढासळत असून याच संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव (Union Minister Bhupender Yadav) यांना पत्र लिहिले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषत: शहरांमधील हवेची गुणवत्तेची बिघडलेली परिस्थिती तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी हे पत्र लिहिले असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यात नमूद केले आहे. वाढत्या हवा प्रदूषणामुळे राज्यातील नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होत असून या आव्हानाला तोंड देण्यासाठी धोरणात्मक पातळीवर फारशी प्रगती झालेली नाही. त्यामुळे शहरांमध्ये ताजी हवा आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. महाराष्ट्राला स्वतंत्र कार्यभार असलेला पर्यावरण मंत्री नसल्याने हा प्रश्न तुमच्यामार्फत केंद्र सरकारपर्यंत पोहोचवत असल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले.

गेल्या सहा महिन्यांमध्ये मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘खराब’ आणि ‘अति खराब’ अशा स्थितीपर्यंत पोहोचली आहे. राज्यातील इतर शहरांमधील हवेची गुणवत्ता खालावत आहे. याची अनेक कारणे असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. मुंबईत सुरू असलेली बांधकामं, 24 तास सुरू असणाऱ्या रिफायनरी आणि खतनिर्मितीचे कारखाने यासह अन्य कारणांचा त्यांनी पत्रामध्ये उल्लेखही केला असून यावर काही उपाययोजनाही सुचवल्या आहेत.