महाराष्ट्राला काहीच फायदा नसलेल्या बुलेट ट्रेनवर ‘रील मिनिस्टर’चे लक्ष, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आदित्य ठाकरे आक्रमक

मुंबईच्या लोकल सेवेत चांगली सुधारणा करण्याऐवजी बुलेट ट्रेनवर लक्ष केंद्रित केलेल्या मोदी सरकारवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी जोरदार निशाणा साधला. लोकल ट्रेन मार्गावर मृत्यूचे सत्र सुरू आहे. असे असतानाही ‘रील मिनिस्टर’ बुलेट ट्रेनवर लक्ष केंद्रित करतील. त्याचा महाराष्ट्रासाठी काहीच फायदा नाही, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आणि लोकल मार्गावरील अपघाती मृत्यूंबाबत चिंता व्यक्त केली.

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंब्रा येथील अपघातानंतर रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी बुधवारी ‘एक्स’च्या माध्यमातून रेल्वेमंत्र्यांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी लोकल मार्गावरील अपघाती बळींची आकडेवारी असलेले वृत्त शेअर केले. आणि तरीही ‘रील मिनिस्टर’ बुलेट ट्रेनवर लक्ष केंद्रित करतील. ज्याचा महाराष्ट्रासाठी कोणताही फायदा नाही. बुलेट ट्रेन प्रकल्पाने वांद्रे-कुर्ला संकुल येथील जमीन फुकटात हिसकावून घेतली आहे. ज्या पद्धतीने इंटरनॅशनल फायनान्स सेंटर महाराष्ट्राकडून हिसकावून घेतले होते. बुलेट ट्रेनसाठी खर्च केलेले पैसे मुंबई लोकल ट्रेनची सेवा सुधारण्यासाठी खर्च करता आले असते, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले. मागील 11 वर्षांत मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर 29,970 जणांचा मृत्यू झाला, तर 30,214 जण जखमी झाले. त्याचबरोबर रेल्वेतून पडून 6,760 जणांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी शेअर करीत आदित्य ठाकरे यांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.