मुंबईत उतरण्याआधी विमानाच्या घिरट्या, टर्ब्युलन्सवेळी प्रवाशांची आरडाओरड! अहमदाबाद घटनेनंतर भिती कायम

दोन दिवसांपूर्वी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. यामध्ये 290 जणांनी आपला जीव गमावला. या अपघातामुळे संपूर्ण देश हादरून गेला. यामुळे सध्या विमान प्रवास करण्यासाठी प्रवासी घाबरत आहे. अशातच शुक्रवारी चेन्नईहून मुंबईकडे येणाऱ्या विमानाचे काही तांत्रित कारणांमुळे उशीराने लँडिंग झाले. विमानाला बराच वेळ आकाशात  घिरट्या घालाव्या लागल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.

एअर इंडियाचे AI 2740 हे विमान चेन्नईहून मुंबईकडे येण्यासाठी निघाले होते. हे विमान दुपारी 3 वाजून 25 मिनीटांनी उड्डाण करणार होते मात्र काही कारणास्तव या विमानाचे उड्डाण उशिरा झाले. त्यामुळे मुंबईत देखील उशिरा पोहोचले. दरम्यान ते मुंबईजवळ पोहोचत असताना अचानक हादरले. टर्ब्युलन्स वेळी प्रवासी घाबरले आणि आरडाओरडा करू लागले. बराच वेळ विमान आकाशात घिरट्या घेत असल्यामुळे प्रवाशांमधील भीतीचे वातावरण बघता पायलटने यासंदर्भात काही सुचना दिल्या.

विमान लँडिंगसाठी रन वे उपलब्ध नाहीये. त्यामुळे लँडिंगला उशीर होणार, असे पायलटने सांगितले. पण ही सूचना मिळेपर्यंत सारे घाबरले होते. अशी माहिती विमानातले प्रवासी संतोष वैद्य यांनी दैनिक सामनाशी बोलताना दिली. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घोषणा आधी व्हायला हवी, असा सल्ला वैद्य यांनी यावेळी दिला. दरम्यान, काही वेळाने विमानाचे सुखरूप लँडिंग झाल्यांनंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

दिल्लीच्या विमानाचे फुकेट एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग

अहमदाबादच्या विमान दुर्घटनेचे प्रकरण ताजे असताना शुक्रवारी दिल्लीच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे थायलंडमधील फुकेट विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन कॉल आल्यामुळे थायलंडच्या आकाशात विमानाला काही वेळ घिरट्या घालाव्या लागल्याने प्रवाशांचा थरकाप उडाला होता.