
माणुसकीची अवहेलना आणि बदनामी करणाऱया परिस्थितीला जोरदार कलाटणी देण्याचे यत्न अनेक शहरी सुधारकांनी आजवर पुष्कळ केले; पण त्या बुद्धिवादी यत्नांची आंच लक्षावधी खेडय़ांत पसरलेल्या अडाणी बहुजन समाजापर्यंत जाऊन कधी पोहोचलीच नाही. मुख्य अडचणीचा प्रश्न तर या कोटिगणती खेडुतांचाच आहे. त्यांच्या आचार-विचारात आरपार ाढांती घडवण्यासाठी तेथे पाहिजे जातीचा. नुसता `जातीचा` असूनही भागणार नाही, तर ज्या पूर्वीच्या साधुसंतांनी देव-धर्मविषयक भ्रमिष्टवादाचा फैलावा केला, त्यांच्याच `मातीचा` तो असल्याशिवाय क्रांतीचे हे महान कार्य तडीला जाणार नाही.
संत गाडगेबाबा त्याच नि तसल्याच जातीचे नि मातीचे चालू घडीचे महान क्रांतिकारक साधू, धर्माच्या नावावर होणाऱया हिंसाबंदीचे कार्य भारतात मोठय़ा प्रमाणावर संत गाडगेबाबांनीच केले. महाराष्ट्रात भरणाऱया बहुतेक ग्रामीण यात्रेतून देवांच्या नावावर होणारी हिंसा बंद करण्यासाठी आपल्या अनुयायी मंडळींना पाठवून बाबा सप्ते करण्यास सांगत व आपण प्रत्यक्ष तेथे त्या त्या वेळी जाऊन आपल्या निर्भीड व सडेतोड वाणीने लोकांना उपदेश करीत. या कार्यात अनेक ठिकाणी जिवावरही बेतले; पण त्याची बाबांनी कधीच पर्वा केली नाही. अहमदनगर जिह्यात वरवंडी येथे होणारी प्रचंड हिंसाही आपल्या अनुयायी मंडळींसह तेथे अनेकदा जाऊन शेवटी ती बंद केली. आणि त्या जागेवर सुंदर विठ्ठल-रखुमाई मंदिर बांधले. हे कार्य हातावेगळे होताच राहुरी येथे त्यांना एक प्रशस्त जागा मिळाली. तेथे काही वर्षे गोरक्षण चालविले.
त्या भागात फिरत असताना तेथील आदिवासी, भिल्ल लोकांचे हाल त्यांना दिसले. अठराविश्वे दारिद्रय़ाने पिडलेले, शिक्षण व संस्कार नसल्यामुळे पसरलेले घोर अज्ञान व अज्ञानामुळेच व्यसने, देवाच्या नावावर हिंसा आणि त्याच्यांत आलेला निरोद्योगीपणाही त्यांच्या नजरेतून सुटला नाही.
त्यांनी राहुरी येथे मिळालेल्या जागेवर आदिवासी मुला-मुलींकरिता आश्रमशाळा काढण्याचे ठरले व इ.स. 1954 साली तिची स्थापना झाली. संत गाडगे महाराज मिशनच्या शैक्षणिक कार्याला आज जे प्रचंड प्रवाहाचे रूप आले त्याचा ही आश्रमशाळा हा उगमच म्हटला पाहिजे. याच वर्षी मूर्तिजापूर येथेही विद्यालयाची सुरुवात संत बाबांनी करून दिली होतीच. स्वत बाबा अंगठा बहाद्दर होते; पण गोरगरीब आदिवासींच्या मुला-मुलींना शिक्षण मिळावे अशी त्यांना तळमळ होती.
दुसऱयाचे दुःख पाहिले की ते दूर करावयाचे हा बाबांचा नेहमी प्रयत्न असे. सर्व भारतातून मुंबईस असाध्य रोगाच्या औषधोपचारासाठी लोक येतात. रोगी दवाखान्यात राहतो. पण सोबतच्या चार-दोन माणसांची मुंबईसारख्या शहरात सोय होणे कठीण असते. धनिकांची पैशामुळे कोठेही सोय होते; पण सर्वसाधारण माणसांचे काय?
मुंबईत जे. जे. हॉस्पिटलच्या भागात बाबा नेहमी जात, रस्त्यावर आडोशाला सामान ठेवून, स्वयंपाक पाणी करणारे रोग्यांचे संबंधित त्यांनी अनेक वेळा पाहिले. त्यावेळी त्यांना कल्पना आली की, या लोकांकरिता जर एखादी धर्मशाळा बांधली तर त्यांच्या सोयीच्या दृष्टीने बरे होईल. बाबांच्या मनात येताच सरकार व जे. जे. ट्रस्टकडून जागा मिळवून त्यावर उदार धनिकांच्या सहकार्याने उत्तम सर्व सोयींयुक्त धर्मशाळा इ.स. 1954 साली बांधली. असा बाबांचा लोकसेवा, लोकशिक्षण व जनजागृतीच्या कार्याचा तडाखा चालू होता. लोकोद्धाराच्या सेवाकार्याची त्यांची तळमळ त्यांना घडीभरही स्वस्थ बसू देत नव्हती, मन बलवान होते, शरीर थकत चालले होते. निर्वाणाच्या अगोदर वर्ष-दोन वर्षांपासून बाबा कीर्तनातून नेहमी सांगत की, “जन्मलेला माणूस मरतोच, मलाही आज ना उद्या मरण येणार. मला मरण कोणाच्या घरात, कोणाच्या दारात, संस्थेत यायला नको, तर ते एखाद्या बेवारशी माणसासारखे रस्त्यावर आले पाहिजे.“ दीनदुःखी अशा कुष्ठरोग्यांच्या सेवेची बाबांना फार आवड होती. नाशिक येथे कुष्ठधामाच्या उद्घाटनासाठी ते हजर होते. त्यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांना दोन शब्द बोलण्याची विनंती केली. संत बाबा म्हणाले, “भाग्यवान तोच की, ज्याचे शरीर निरोगी आहे, हे महारोगी दुःखाने पिडलेले अभागी जीव आहेत. भाग्यवानांनी या अभागी जिवांकरिता काही केले पाहिजे. हे कुष्ठधाम तुमचे माना. याला मदत करा. यात रोग्यांची दुःखे दूर होतील. हाच खरा दान व धर्माचा मार्ग आहे.“ रंजल्या गांजल्यांचे दुःख निवारण कसे होईल हा एकच ध्यास शेवटच्या क्षणापर्यंत बाबांना लागला होता.
मराठी निर्भीड लेखक व थोर समाजसुधारक, प्रबोधनकार स्व. ठाकरे यांनी संत गाडगेबाबांच्या चरित्रात इ.स. 1952 पर्यंतच्या घटनांचा उल्लेख आपल्या वैशिष्टय़पूर्ण शैलीने फारच उत्कृष्टपणे चितारला आहे. प्रत्येक प्रसंगाचे चित्र वाचकांच्या डोळ्यांसमोर साकार करणे हा त्यांच्या लेखनातील महत्त्वाचा गुण आहे.
श्री संत गाडगेबाबा
लेखक : प्रबोधनकार ठाकरे
प्रकाशन : साकेत प्रकाशन, छ. संभाजीनगर
पृष्ठे : 144