लेख – युवकांतील वाढती नशा आणि पालकांची भूमिका

>> डॉ. प्रीतम भि. गेडाम,  [email protected]

गेल्या आठ वर्षांत हिंदुस्थानात अमली पदार्थांचा वापर 70 टक्क्यांनी वाढला असून देशात सुमारे 100 दशलक्ष व्यसनी आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, हिंदुस्थानातील 13 टक्के ड्रग्ज व्यसनी हे 20 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. आजची मुले ही उद्याच्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. आजची तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी जात आहे, त्यांना अमली पदार्थांपासून वाचवण्याची जबाबदारी पालकांची आहे. आपली जबाबदारी चोखपणे पार पाडणे हे पालकांचे परमकर्तव्य आहे.

अमली पदार्थांची वाढती तस्करी आणि ड्रग्जच्या आहारी जात असलेली तरुण पिढी हे संपूर्ण मानवजातीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अमली पदार्थांच्या तस्करीच्या बातम्या रोज वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवर पाहायला व वाचायला मिळतात. अमली पदार्थांचा हा व्यापार झपाटय़ाने वाढत असून त्यात तरुण पिढी बरबाद होत आहे. नशा हे ‘नाश’चे दुसरे नाव आहे, जे माणसाला संपूर्णतः उद्ध्वस्त करते. शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक अशा प्रत्येक प्रकारे नशा माणसाला पोकळ बनवते. व्यसनामुळे रोग, ताण, शारीरिक असंतुलन, गोंधळ, द्वेष, क्रोध यांसारख्या परिस्थितींमध्ये वाढ झाल्याने कुटुंबात कलह वाढतो. गुह्यांमध्ये वाढ होण्यात नशा मोठी भूमिका बजावते.

अमली पदार्थांच्या व्यसनाधीनांकडे समाजात तुच्छतेने पाहिले जाते, कुटुंबातील लोक आणि नातेवाईकही त्यांच्यापासून दूर पळतात. नशेत पैशांचा अपव्यय होत असल्याने समाजातील प्रतिष्ठाही झपाटय़ाने कमी होते. नशेत माणसाची विचारशक्ती कमकुवत होते. अमली पदार्थांच्या आहारी गेलेले लोक अस्वस्थ राहतात, जीवनातील आनंद नाहीसा होऊ लागतो. लोकांकडून तिरस्कार होतो. काही वेळा तर कुटुंबातील सदस्य आणि शेजारी व्यसनाधीन लोकांना इतके कंटाळतात की, ते त्यांच्या मृत्यूची इच्छादेखील करू लागतात. अमली पदार्थांच्या व्यसनींना समाजात कोणीही चांगले मानत नाही. व्यसनाधीनांना कोणी कामावर ठेवू इच्छित नाही. कारण ते व्यवस्थित कामे करीत नाहीत. परिणामी आर्थिक अडचणींमुळे ते स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाहीत. नशेच्या आहारी जाण्यासाठी व्यसनाधीन गुन्हे करण्यासही तयार असतात. त्यामुळे समाजात दारिदय़, नशा आणि गुन्हेगारीचे चक्र असेच सुरू असते.

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने केलेल्या अभ्यासानुसार, देशातील किशोरवयीन मुलांमध्ये तंबाखू आणि दारू ही सर्वात सामान्य व्यसनं आहेत. मग इनहेलेंट्स आणि भांग आहेत. तंबाखूचा वापर सुरू केलेले सरासरी वय 12 वर्षे दर्शविले. आणखी एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, 46 टक्के झोपडपट्टीत राहणाऱ्या किशोरवयीन मुलांनी अगदी लहान वयात धूम्रपान आणि तंबाखू तसेच दारू आणि गांजा यांचा वापर सुरू केला होता. शहरांतील अनेक झोपडपट्टय़ांमध्ये किंवा अनेक ग्रामीण भागात अगदी 6-7 वर्षे वयोगटातील मुलेही ज्वलनशील रसायने व अमली पदार्थांचा उग्र वास घेताना किंवा तंबाखू खाताना दिसतात. 2022 मध्ये 26,629 किशोरवयीन मुलांनी अमली पदार्थ सेवन केल्याची नोंद झाली आहे, जी 2016 च्या तुलनेत 300 टक्के वाढ दर्शवते. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने केलेल्या राष्ट्रीय व्यापक सर्वेक्षणानुसार, देशात 6 कोटींहून अधिक ड्रग्ज वापरणारे आहेत, ज्यामध्ये मोठय़ा संख्येने वापरकर्ते 10-17 वयोगटातील आहेत.

ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या नॅशनल ड्रग डिपेंडन्स ट्रीटमेंट सेंटरने शालेय विद्यार्थ्यांमधील अमली पदार्थांच्या गैरवापरावर केलेल्या अभ्यासादरम्यान असे आढळून आले की, सर्वेक्षण केलेल्या 14 पैकी 1 विद्यार्थ्यांनी गेल्या महिन्यात कोणते तरी अमली पदार्थ वापरले होते. हे सर्वेक्षण मे 2019-जून 2020 दरम्यान इयत्ता 8-12च्या सुमारे 6000 शालेय विद्यार्थ्यांवर करण्यात आले. सर्वेक्षणात असे आढळून आले की, 10 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मादक द्रव्यांचे सेवन (इनहेलेंट्स, कॅनॅबिस, ओपिओइड्सपासून ते अल्कोहोल आणि तंबाखूपर्यंत) केले होते. वर्षनिहाय विश्लेषणात असे दिसून आले की, 4 टक्के तंबाखू वापरतात, त्यानंतर अल्कोहोल 3.8 टक्के, ओपिओइड्स 2.8 टक्के (अफू, हेरॉइन आणि फार्मास्युटिकल ओपिओइड्स), कॅनॅबिस (भांग, चरस आणि गांजा) 2 टक्के आणि 1.9 टक्के विद्यार्थ्यांनी इनहेलेंट्सचा नशा केला. इंडियन जर्नल ऑफ सायकियाट्रीने मेटा-विश्लेषणात म्हटले आहे की, शालेय विद्यार्थ्यांमध्ये मादक पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण 18 टक्के इतके जास्त आहे.

गेल्या आठ वर्षांत हिंदुस्थानात अमली पदार्थांचा वापर 70 टक्क्यांनी वाढला असून देशात सुमारे 100 दशलक्ष व्यसनी आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, हिंदुस्थानातील 13 टक्के ड्रग्ज व्यसनी हे 20 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. देशाच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने शेवटच्या अहवालात अमली पदार्थांच्या अंदाजे वापराची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात असे दिसून आले की, 31 दशलक्ष गांजाचे वापरकर्ते होते, 24 दशलक्ष ओपिओइड वापरकर्ते आणि 7.7 दशलक्ष इनहेलर वापरत होते. 2047 पर्यंत हिंदुस्थानला ‘अमली पदार्थमुक्त’ करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

आजच्या आधुनिक युगात मुलं खूप सक्रिय आणि महत्त्वाकांक्षी दिसतात. मुलांना लवकरात लवकर स्वतंत्र आणि स्वावलंबी व्हायचे असते. आधुनिकता आणि इंटरनेटमुळे मुले खूप लवकर मोठी झालेली दिसतात. बहुतेक पालक असेही म्हणतात की, त्यांची मुले खूप हुशार आणि होनहार आहेत. सर्व पालकांना त्यांच्या मुलांचा अभिमान आहे ही चांगली गोष्ट आहे, परंतु आजच्या काळात पालकांनी मुलांच्या चांगल्या-वाईट, सर्व कामांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मुलांमध्ये नशेच्या वाढत्या प्रमाणाला सर्वात मोठे दोषी पालक आहेत. जर वेळीच मुलांना योग्य मार्गदर्शन आणि सोयिस्कर संगोपन मिळाले असते तर इतकी वाईट परिस्थिती उद्भवली नसती. मुलांची दैनंदिन दिनचर्या, त्यांचे मित्र, वर्गमित्र, मुले कोणाला भेटतात, कुठे येतात-जातात, त्यांचा वेळ कुठे आणि किती घालवतात हे पालकांनी जाणून घेतले पाहिजे. मुलांचे पालकांशी खोटे बोलणे आणि बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतण्याचे प्रमाण आजकाल खूप वाढले आहे. अमली पदार्थांकडे वाटचाल करणारी तरुण पिढी समाजासाठी शाप ठरली आहे. या वयात मुलांना अधिक हाताळणीची आवश्यकता असते. पालकांचा व्यस्ततेचा बहाणा आणि मुलांवरचा त्यांचा आंधळा विश्वास मुलांच्या येणाऱ्या उज्ज्वल भविष्याला उद्ध्वस्ततेकडे वळवतो. मुलांना बोलण्यात किंवा वागण्यात कसलाही संकोच वाटू नये म्हणून पालकांनी मुलांना मित्रासारखे वागवावे. मुलांसोबत वेळ घालवावा, मुलांचे वर्तन त्यांच्या जिज्ञासा आणि स्वभावानुसार समजून घेणे, खोटा देखावा टाळावा, मुलांसोबत पालकांनी जीवनातील चांगल्या-वाईट गोष्टी, अनुभव शेअर करावेत. मुलांसमोर कधीही अयोग्य वागू नका. पालकांनी मुलांसमोर नशा करणे ही लज्जास्पद बाब आहे. नशा कोणीही कधीही कोणत्याही वयात कधीच करू नये, नशेमुळे फक्त नुकसानच होते. आजची मुले ही उद्याच्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. आजची तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी जात आहे, त्यांना अमली पदार्थांपासून वाचवण्याची जबाबदारी पालकांची आहे. आपली जबाबदारी चोखपणे पार पाडणे हे पालकांचे परमकर्तव्य आहे.