
>> राहुल गोखले
जगात होणाऱ्या विपुल साहित्यनिर्मितीतली काहीच पुस्तके वाचकप्रिय ठरतात. ती तशी का ठरतात याची अनेक कारणे असली तरी त्या कथा-कादंबऱयांतील पात्रे हेही त्याचे एक कारण असते. ती पात्रे काल्पनिक असली तरी सिद्धहस्त लेखक त्याच पात्रांना जिवंत करतो आणि वाचकांच्या मनाचा ती पात्रे ठाव घेतात. ती पात्रे वाचकाला कधी अंतर्मुख करतात; कधी नवी दृष्टी देतात; कधी वाचकाच्या अनुभवाला शब्दरूप देतात तर कधी अपरिचित विश्वाचे दर्शन घडवितात. वृषाली किन्हाळकर यांनी वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱया पात्रांचा वेध ‘कागदावरची माणसं’ या पुस्तकातून घेतला आहे. हा एक अनोखा प्रयोग आहे.
पात्रांचा परिचय करून द्यायचा म्हणजे त्या पुस्तकाचा परिचय करून देणे हे ओघानेच आले; कारण तसे केले नाही तर त्या पात्रांचा संदर्भ वाचकांच्या लक्षात यायचा नाही. हा
कॅनव्हास आहे, ज्यावर ती पात्रे संचार करतात. लेखिकेने तिला भावलेल्या एकोणचाळीस पात्रांचा परिचय करून दिला आहे. त्यात केवळ स्थलकाल वैविध्य आहे असे नाही; तर सामाजिक-कौटुंबिक-राजकीय परिस्थिती देखील अगदी भिन्न आहे. शिवाय पात्रांचा परिचय करून देताना लेखिकेने त्याचे वैशिष्टय़ नोंदविले आहे; त्याबरोबरच जेथे काही खटकले तेही नमूद केले आहे. विभावरी शिरुरकर असे टोपण नाव घेतलेल्या मालती बेडेकर यांच्या `हिंदोळ्यावर’ या कादंबरीतील पिचलेली अचला हिचे नाव अचला असले तरी ती अचल, कणखर मुळीच नाही असे निरीक्षण लेखिका नोंदविते. `श्यामची आई’ या पात्राविषयी लिहिताना लेखिका म्हणते: `आयुष्य कळून घेण्यासाठी ही अमृतगाथा आहे’. विश्राम बेडेकर यांच्या `रणांगण’मधील यहुदी तरुणी हॅर्टा ही पाधरपेक्षाही अधिक उंचीची वाटते आणि वयाच्या मानाने ती प्रगल्भ आहे असे लेखिका नोंदविते. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढणारा श्री. ना. पेंडसे यांचा `गारंबीचा बापू’; धनगर समाजाचे भावविश्व उलगडून दाखविणाऱया व्यंकटेश माडगूळकर यांच्या `बनगरवाडी’तील ध्येयवादी मास्तर, आपली पायरी ओळखून आपल्या प्रेमाला बांध घालणारी संयमी, सोशिक पण दुर्दैवी अशी गो नी दांडेकर यांची ‘शितू’; अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीतील गावाच्या इभ्रतीसाठी प्राण देणारा राणोजी आणि कृष्ण-वारणेच्या खोऱयात लपून इंग्रज अशा कितीतरी पात्रांचा सम्यक वेध लेखिका घेते. अशी पात्रे केवळ कथा-कादंबरीची गरज म्हणून त्या-त्या साहित्यिकाने निर्माण केलेली नव्हेत. ती पात्रे काही सांगू इच्छितात. मानवी भावनांचे प्रकटीकरण त्या पात्रांच्या माध्यमातून लेखक करत असतो. अशा उठावदार पात्रांचा हा वेध वाचकांना मूळची साहित्यकृती वाचण्यास उद्युक्त करेल यात शंका नाही. भारत सासणे यांची प्रस्तावना वाचनीय. रविमुकुल यांचे मुखपृष्ठ वेधक.
कागदावरची माणसं
लेखक : वृषाली किन्हाळकर प्रकाशक : अनुबंध प्रकाशन, पुणे
पृष्ठे : 256; मूल्य : 450 रुपये