सत्याचा शोध- जनांचा निर्धार, करी देवीचा उद्धार!

>> चंद्रसेन टिळेकर

समाजातील काही लोकांना त्यांची आपली मोठय़ा लोकांशी चांगली ओळख आहे असे सांगण्याची भारी हौस (खोड) असते. कीर्तिमान अन् कर्तृत्ववान व्यक्ती इहलोक सोडून गेली की, त्यांची आणि आपली मैत्री कशी घनिष्ठ होती, ते आपल्या प्रत्येक गोष्टीचे कसे कौतुक करत असत ते इतक्या विस्ताराने सांगायला लागतात की, आपल्याला प्रश्न पडतो की ते गेलेल्या महान व्यक्तीला श्रद्धांजली वाहात आहेत की स्वतला. जोपर्यंत ही खोड मानवी पातळीवर असते, तोपर्यंत तिच्याकडे हसून दुर्लक्ष करता येते. पण हाच प्रकार जेव्हा दैवी पातळीवर जातो, तेव्हा मात्र केवळ हसून या प्रकाराकडे दुर्लक्ष करता येत नाही. कारण अशी ग्वाही किंवा शेखी मिरवत फिरणे हे एकतर मानसिक संतुलन बिघडल्याचे लक्षण असते किंवा लबाडी असते. तसंच त्यात समाजाची दिशाभूल होण्याचा धोका असतो.

अर्थात देव आपल्याशी बोलतो, आपल्या स्वप्नात येतो, गप्पा मारतो, (सांगणारी स्त्राr असेल तर आपल्याशी फुगडी खेळतो) असे सांगणारे बुवा, माताही उदंड आहेत आणि आश्चर्य म्हणजे त्यावर विश्वास ठेवणारेही उदंड आहेत. उत्तरेतील एक अत्यंत प्रसिद्ध रामेश्वर का सोमेश्वर बाबा बिनदिक्कतपणे आपल्या भक्तांना सांगत असतो की, रोज रात्री मारुती त्याला दृष्टांत देतो आणि हितगुज करतो. या बाबाला त्याच्या एकाही भक्ताने विचारले नाही की, “एवढे जर तुझे मारुतीरायाशी संधान आहे, तर त्याने तुला पहलगामच्या हत्याकांडाची कल्पना का बरे दिली नाही? त्यानंतरही देशात छोटय़ा-मोठय़ा घटना घडत असतात, हत्या-आत्महत्या होतात, अन्नाअभावी लोक रोज उपाशी मरतात, पण त्याची सूचना तुला मारुतीराया का देत नाही किंवा स्वत ते सारे का थांबवित नाही?’’ कारण अध्यात्माचाच एक भाग असलेल्या भक्तिमार्गात कसलेही प्रश्न विचारायचे नसतात, शंका घ्यायची नसते. केवळ श्रद्धा ठेवायची असते. इतकी की, आपण मानलेला (खरं म्हणजे धरलेला ) बुवा, बाबा, महाराज स्वामी जर म्हणाला, “बैल दूध देतो’’ तर आपणही नंदीबैलासारखी मान हलवून “हो’’ म्हणायचे असते.

देव वा देवी स्वप्नात येते असे सांगून एखादी व्यक्ती आपली पोळी कशी भाजून घेते याबद्दलचा एक किस्सा इथे सांगावासा वाटतो. काही वर्षांपूर्वी कोकणातल्या एका तालुक्याच्या गावी व्याख्यानानिमित्त जावे लागले होते. व्याख्यानाच्या दुसऱया दिवशी मला संयोजक म्हणाले, “चला, तुम्हाला आमच्या गावातले देवीचे मंदिर दाखवतो, अगदी बघण्यासारखे आहे. जागृत देवस्थान आहे बरं.’’

माझी मोठी पंचाईत झाली. कारण आदल्या दिवशीच्या अंधश्रद्धेवरील व्याख्यानात मी आडून आडून का होईना देव ही एक मानवी उक्रांतीत स्त्रियांनी जेव्हा शेतीचा शोध लावला तेव्हा निर्माण झालेली कल्पना आहे असे सांगून टाकले होते. तेव्हा नाही म्हटले तरी माझी थोडी पंचाईतच झाली होती. पु. ल. देशपांडे एके ठिकाणी म्हणतात तसे, “समजायला लागल्यापासून माझा एकाही देवाला नमस्कार घडलेला नव्हता.’’ पण यजमानांना नाही कसे म्हणावे? माझी चक्क आरती प्रभूंची नायिका म्हणते तसे “नाही कसे म्हणू तुला’’ अशी गत झाली होती. मी मुकाटय़ाने यजमानांच्या पाठीमागून चालू लागलो. मला उगाचच वाटत होते की, कालचे व्याख्यान ऐकलेल्यापैकी एखादा मी देवाच्या दर्शनाला चाललोय हे पाहून ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ असे मला खिजवण्यासाठी म्हणतोय. साहजिकच मी आपला कसायाच्या मागून गाईने जावे तसा जात होतो. शेवटी एकदाचे ते देऊळ आले. बराचसा भाग संगमरवरी होता. मी पाहातच राहिलो. मला वाटले की, एवढय़ा पैशांत दोन प्राथमिक शाळा नाहीतर एखादे प्रथमोपचार केंद्र अथवा गेला बाजार छोटेसे वाचनालय तरी उभे राहिले असते. तेवढय़ात मला संयोजक म्हणाले, “कसे वाटले देऊळ तुम्हाला?’’

मी म्हटले, “उत्तमच आहे की!’’

“चला आत जाऊन दर्शन घेऊ या.’’

तसं मी तत्परतेने म्हटलं, “अहो इथून मूर्ती छान दिसतेय की.’’ मी लगबगीने लांबूनच काय म्हणतात ते ‘देखल्या देवा दंडवत’ करतात तसे केले. गाडगेबाबाही म्हणे पंढरपूरला जाऊन देवळात न जाता देवाचे दर्शन लांबूनच घेत. क्षणभर का होईना मला आपण गाडगेबाबा झाल्यासारखे वाटले. ‘गोपाळा, गोपाळा देवकीनंदन गोपाळा’ असे म्हटले नाही एवढेच काय ते! थोडय़ा वेळाने यजमान म्हणाले, “मी तुम्हाला इथे आणले. कारण हे जागृत देवस्थान आहे. कारण या देवळातली मूर्ती स्वयंभू आहे. कुणा मूर्तिकाराने घडवलेली नाही. स्वयंभू मूर्ती असलेले जागृत देवस्थान आहे.’’

“स्वयंभू मूर्ती म्हणजे?’’

“आपोआप निर्माण झालेली, जमिनीतून किंवा पाण्यातून वर आलेली. या शेतकऱयाच्या स्वप्नात देवी आली आणि त्याला म्हणाली,  “मला वर काढ, मी इथे गुदमरतेय. मग आम्ही सर्व गावकरी एकत्र आलो, वर्गणी जमवली आणि हे देखणे देऊळ बांधले.’’

“आणि यावर तुमचा विश्वास बसतो?’’

“का नाही बसणार? तुम्ही या देवीपुढे कुठलाही नवस बोला ना, पहा देवी तुमच्या नवसाला पावते की नाही ते.’’

मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवातली नवसाची साथ इतक्या दूरपर्यंत आलेली दिसत होती.

“कधी असते ती यात्रा?’’

“फेब्रुवारी महिन्यात असते. तारीख मात्र देवी सांगेल ती आम्ही धरतो.’’

“देवी सांगेल म्हणजे?’’ मी गडबडून विचारले.

“अहो तारखेसाठी आम्ही देवीला कौल लावतो. देवीच्या ज्या बाजूवरून फूल खाली पडेल त्यावरून तारीख ठरवली जाते.’’ या कौल अंधश्रद्धेच्या विरोधात कसलाच कौल देण्याच्या मनःस्थितीत मी उरलो नव्हतो. खरं सांगायचे तर माझी त्याक्षणीच बोबडी वळली होती. त्यामुळे पुढे मी कुठलाच प्रश्न विचारला नाही. त्या जागृत देवस्थानात. ‘चप्पल चोरांपासून सावध रहा’ अशी पाटी का होती ते मी विचारले नाही. ज्या देवीला जमिनीतून स्वत वर येता येत नाही, मर्त्य मानवाची गरज लागते तिला स्वयंभू का म्हणावे असेही विचारले नाही. इतकेच काय पण ‘आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करू’ असे चार दशकांपूर्वी आश्वासन देणाऱया राजकीय पुढाऱयांचे कान का उपटले नाहीत हेही मी विचारले नाही. परतीच्या प्रवासात एका प्रवाशाने मला सांगितले की, ती जमीन पडीक होती. अडचणीच्या जागी होती. कोणी विकत घेत नव्हते म्हणून त्या जमिनीच्या मालकाने स्वयंभू मूर्तीची आवई उठवली होती. खरे-खोटे ते यजमान जाणो, तो जमीनमालक जाणो अथवा ती स्वयंभू निर्माण झालेली देवी जाणो!

[email protected]

(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)