सत्याचा शोध- परिवर्तनाची उलटी गंगा!

>> चंद्रसेन टिळेकर

आपल्या परिवर्तनाची गंगा उलट दिशेने वाहू लागली आहे की काय असे रोजच्या वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचल्यानंतर आपल्याला वाटू लागते. वृत्तपत्रात ज्या बातम्या रोज वाचायला मिळतात त्यावरून आपल्या समाजाची नीतिमत्ता किती ढासळली आहे हे प्रकर्षाने लक्षात येते. नीतीऐवजी आपण आता वित्ताचा लोभ धरू लागलो आहे की, जो लोभ षड्रिपूपैकी एक समजला जातो.

आपल्या देशातील समाजधुरिणांची अशी कल्पना होती की, जसजसा काळ पुढे जाईल तसतसा आपला समाज शिक्षणाने सुशिक्षित होईल, सुविद्य होईल आणि आपल्या समाजातील अज्ञान नष्ट होईल, अडाणीपणा जाईल. नेटकेपणे बोलायचे तर अंधश्रद्धा आणि दुष्ट परंपरा यांचा आपण बीमोड करू शकू. परिणामी आपल्याला विकासाची पावले दमदारपणे टाकता येतील. याचबरोबर अशीही एक अटकळ होती की, शिक्षणाने व्यक्ती सुसंस्कृत होत असल्याने ती आपसूक नीतिमानही होईल. यासाठी ही मंडळी स्वातंत्र्याची पहाट केव्हा होईल याची वाट पाहत होती. कारण स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या मनाप्रमाणे समाज घडवता येईल असा आशावाद केवळ ते दिग्गजच नव्हे, तर आपण सर्वच जण उराशी बाळगून होतो. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळून तब्बल पाऊणशे वर्षे होऊन गेली, परंतु आपण सर्वांनी मनात योजलेले ते केवळ दिवास्वप्न होते की काय, असे आता जाणकारांसह सर्वसामान्यांनाही वाटू लागले आहे. काही बाबतीत तर आपल्या परिवर्तनाची गंगा उलट दिशेने वाहू लागली आहे की काय असे रोजच्या वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचल्यानंतर आपल्याला वाटू लागते. वृत्तपत्रात आपल्याला ज्या बातम्या रोज वाचायला मिळतात त्यावरून आपल्या समाजाची नीतिमत्ता किती ढासळली आहे हे प्रकर्षाने लक्षात येते. नीतीऐवजी आपण आता वित्ताचा लोभ धरू लागलो आहे की, जो लोभ षड्रिपूपैकी एक समजला जातो. विवाहप्रसंगी असंख्य वरपिते लोभाच्या, मोहाच्या जबडय़ात स्वखुशीने जाताना दिसतात. दुष्ट परंपरेतील हुंडा ही एक लाजिरवाणी परंपरा आपल्या देशात किती तरी काळ चालत आलेली आहे, पण या आधुनिक युगातही ही अनिष्ट परंपरा अस्तंगत होत नाही किंबहुना आमच्यातले काही स्वार्थीजन तिला मरू देत नाहीत.  सर्व समाजसुधारकांनी या प्रथेवर जोराचे आसुड ओढलेले आहेत, पण आपल्या समाजातील हुंडाबळीची संख्या काही कमी होत नाही हे आमचा समाज दिवसेंदिवस लोभी आणि अनीतिमान झाल्याचेच लक्षण नव्हे काय?

हुंडय़ाच्या मागणीमुळे वैष्णवीचा बळी गेल्याचे आपण वृत्तपत्रात सर्वांनी वाचलेलेच असेल. आश्चर्य म्हणजे त्याच कुटुंबातील तिच्या थोरल्या जावेचाही असाच छळ होत होता तरी त्याच घरी आपली मुलगी देण्याचा वेडेपणा वैष्णवीच्या आई-वडिलांनी का करावा? याचेही उत्तर आमच्या समाजातील धारणेत आहे ते म्हणजे कन्या हे परक्याचे धन असते. तेव्हा तिचे लवकरात लवकर लग्न लावून तिची सासरी पाठवणी केली पाहिजे. या घिसाडघाईतूनच कितीतरी मुलींना अनेकदा त्या वयात आलेल्या नसताना बोहल्यावर चढवले जाते. काही वेळा मुलीचे आई-वडील आम्ही जावयाला भरपूर हुंडा दिला अशी शेखीही मिरवीत असतात.

वास्तविक हुंडा देणे अथवा घेणे हे अनीतिमान तर आहेच, पण 1961 साली जो कायदा देशाने केला त्या कायद्यान्वये तो गुन्हाही आहे आणि तो गुन्हा करणाऱयाला पाच वर्षांचा तुरुंगवासही आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या राज्यकर्त्यांनी याबाबतीत समाजावर वचक ठेवायचा ते स्वतच अशा प्रकारचे गुन्हे करताना दिसतात. शोषणाचा हेतू मनात ठेवून अनीतिकारक विवाहबाह्य संबंध ठेवून नंतर त्या स्त्राrची प्रतारणा केल्याबद्दल मंत्रिपदावरून हकालपट्टी ओढवून घेणे हे लज्जास्पद नव्हे काय? समाजाला कोणता संदेश ही नेतेमंडळी देत असतात?

अशा प्रकारचे अत्याचार केवळ ग्रामीण भागातच घडतात असा आपला समज आहे, पण तो आता खोटा ठरत आहे. मुंबई पोलिसांचा अहवालच सांगतो की, गेल्या दीड वर्षात स्त्रियांवरील अत्याचाराच्या 600 हून अधिक गुन्हे पोलिसांनी नोंदवले आहेत. हे अर्थातच कर्तव्यदक्ष पोलिसांनी नोंदवलेले गुन्हे आहेत. कारण कित्येकदा पोलीस “हे तुमचे घरचे मॅटर आहे हो, ते तुम्ही घरच्या घरी सोडवा ना’’ असे म्हणून अंग काढून घेतात. त्यातून एखाद्या धनदांडग्याविरुद्ध तक्रार कोणी पीडिता अथवा तिचे कुटुंबीय पोलीस चौकीत गेले तर कसलीही तक्रार ऐकून न घेता त्यांची बोळवण केली जाते. अशाने या अत्याचारांना अटकाव व्हावा तरी कसा?

गमतीची गोष्ट म्हणजे, याच आमच्या समाजात वेळप्रसंगी स्त्रीला देवीच्या मखरात बसवून तिच्यावर स्तुतिसुमनेही उधळली जातात. स्त्राrचा हात जिथे फिरतो तिथे लक्ष्मीचा वास होतो असेही म्हटले जाते. स्त्राr शक्तीचा गौरव करणारा नवरात्रीचा उत्सव तर जागोजागी साजरा केला जातो तरीही स्त्रियांवरील अत्याचार कमी होत नाहीत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, आम्हा भारतीयांच्या हाडीमासी खिळलेला दुटप्पीपणा, ज्याला इंग्रजीत Hypocrisy म्हणतात. हा दुटप्पीपणा मी माझ्या एका कवितेतून मांडला आहे. लेखाचा शेवट त्या कवितेने करणे अगदी योग्य होईल असे मला वाटते. कविता अशी आहे…

आमच्यात…

तिचं स्थान देव्हारी आहे

ती देवता आहे

गर्भजलात दिसता मात्र

खोडून टाकावयाची आहे!

आमच्यात…

स्त्राr ही महन्-मंगल आहे

ती सदैव पूजनीय आहे

शनी चौथऱयावर मात्र

तिचा पाय अपात्र आहे!

आमच्यात…

स्त्राr ही कुलवधू आहे

वंशवेल तिच्या हाती आहे

वंशाला दिवा दिल्यास ठीक

नाही तर बाहेरचा रस्ता मोकळा आहे!

आमच्यात…

स्त्राr ही अर्धांग आहे

तिची जागा मात्र वामांगी आहे!

( ‘कवितेच्या वाटेला’ या काव्यसंग्रहातून)

[email protected]

(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)