
>> रामदास कामत
वयाची पंच्याहत्तरी पार केलेला युद्धवीर जेव्हा म्हणतो की, “युद्धात एक पाय गमावला म्हणून काय झाले? मशीनगन चालवणारे हात अजूनही सक्षम आहेत. फक्त संधी द्या.’’ तेव्हा त्याच्या जिगरबाज वृत्तीला आणि देशप्रेमाला सलाम करावासा वाटतो. त्या युद्धवीराचे नाव आहे प्रकाश महाडिक.
प्रकाश महाडिक यांचा जन्म 1 जून 1949 रोजी पुण्यातील भीमपुरा येथे एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. आई गोदावरी आणि वडील भिवा, दोघेही पोटापाण्याच्या उद्योगासाठी दिवसभर घराबाहेरच असायचे. आई मिलिटरी ऑफिसर्सच्या बंगल्यावर मोलकरीण होती. त्यामुळे मिलिटरी सर्व्हंट क्वार्टरमध्ये त्यांची राहायची सोय झाली होती. नववीपर्यंतचे शालेय शिक्षण घेतल्यानंतर 6 जानेवारी 1967 रोजी ते इंडियन आर्मीच्या महार रेजिमेंटमध्ये भरती झाले. ट्रेनिंग पूर्ण झाल्या झाल्या चीनच्या सीमेवर असलेल्या नेफा प्रदेश या अतिशय बर्फाळ प्रदेशात त्यांची रवानगी झाली.
1971 साली पाकिस्तानने भारतावर हमला केला तेव्हा झालेल्या ऑपरेशन कॅक्टसमध्ये सामील होण्याचे आदेश मिळाले. त्यांच्या विवाहाला काहीच महिने झाले होते. चीन सीमेवरील कार्यकाल पूर्ण झाल्यावर फर्स्ट महार बटालियनला मध्य प्रदेशात सागर येथे पाचारण करण्यात आले. तेथून पुढे पंजाबमधील गुरुदासपूर येथे त्यांचा कॅम्प लागला. तेथे तत्कालीन आर्मी कमांडर जनरल माणेकशॉ (जे नंतर फिल्ड मार्शल या अत्युच्च पदावर पोहोचले) यांच्या प्रेरणादायी भाषणाने ते प्रभावित झाले. माणेकशा यांची उंची, पिळदार मिश्या, डोक्यावर रूबाबदार
कॅप, चालण्याची विशिष्ट ढब या सगळ्यांनी ते अगदी भारावून गेले. अंगात रग होती. प्रत्येक जवान संपूर्ण तयारीनिशी शत्रूशी दोन हात करण्यास सज्ज झाला होता. फर्स्ट महार बटालियनचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल त्रिलोचनसिंग राय यांनी तर शत्रूचा ‘चुन चुन के बदला’ घेण्याचा जणू विडाच उचलला होता.
3 डिसेंबर 1971 रोजी जम्मूमधील कठुआ जिह्यातील हिरानगर येथे शत्रूशी गाठ पडली. भारतीय तोफखान्याच्या कव्हरिंग फायरखालून महाडिक आणि त्यांच्या साथीदारांची आगेकूच सुरू होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांचे पाऊल पाकिस्तानात पडले. देशाची सीमा पार करताना त्यांनी भारतमातेची पवित्र धूळ आपल्या कपाळाला लावली आणि मगच पाकिस्तानात पाऊल ठेवले. समोरच मैलाच्या अंतरावर पाकिस्तानचा पक्का डिफेन्स होता. नुकताच जवळच असलेल्या हरार कलानवर जबरदस्त हमला झाला होता. काळीज हादरवणारा गोळीबार, तोफबाजी, रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आणि त्यांच्या सान्निध्यात घालवलेली ती काळरात्र महाडिक कधीच विसरू शकत नाहीत. दोन्ही बाजूंनी तोफा गडाडल्या, रणगाडे धडाडले, मशीनगन कडाडल्या. रायफली, लाइट मशीनगन… सगळ्यांचा मारा शत्रुपक्षावर होत होता. या अंदाधुंद फायरिंगमध्ये दोन्ही देशांचे अनेक जवान जखमी झाले. त्याच्यापासून जवळच शक्करगढ शहर. पाकिस्तानचे शक्करगढ ताब्यात आले की लाहोर, कराची, इस्लामाबादकडे कूच करणे अवघड नव्हते. शक्करगढ तुटणे म्हणजे पाकिस्तानचे कंबरडे मोडण्यासारखे होते. शक्करगढावर आक्रमणाची जय्यत तयारी झाली होती. शक्करगढला टक्करगढ करायला सेना सज्ज होती, पण रात्री बारानंतर युद्धविराम झाल्याची घोषणा झाली. पूर्व पाकिस्तानात (आताचा बांगलादेश) नियाजीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या 93 हजार सैनिकांनी जनरल अरोरा यांच्यासमोर आत्मसमर्पण पत्रावर सह्या केल्या आणि युद्ध थांबले. युद्धबंदी जरी झाली तरी हाय अलर्ट कायम होते. पेट्रोलिंग, रेकी, रात्रीची गस्त वगैरे सुरूच होते. कारण पाकिस्तान हा भरवसा ठेवण्यालायक देश नाही. यातच एके दिवशी दुर्दैवी माइनब्लास्टमध्ये प्रकाश महाडिक यांचा एक पाय शरीरापासून वेगळा होऊन पाकिस्तानातच काही अंतरावर जाऊन पडला. ते आजही अभिमानाने सांगतात, माझा एक पाय पाकिस्तानात आहे.
महाडिक संग्राम मेडल, पश्चिम स्टार मेडल, सैन्य सेवा मेडल (जम्मू-कश्मीर), स्वतंत्रता जयंती मेडल अशा अनेक सन्मानाचे मानकरी आहेत. आज वयाच्या 76 व्या वर्षीही त्यांचे सैनिकी रक्त तसेच उसळत आहे. “पाय नसला म्हणून काय झाले? मशीनगन चालवणारे हात तर मजबूत आहेत ना?’’ अशा जिगरबाज जवानांमुळेच आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. ते अनेक सामाजिक उपक्रमांत आणि आंदोलनात सक्रिय आहेत. 1992 ते 1995 या काळात ते खोपोली नगर परिषदेत नगरसेवक होते.