समाजभान – मासिक पाळीचा विटाळः एक अंधश्रद्धा

>> जगदीश काबरे

जागतिक आरोग्य संघटनेने 28 मे हा दिवस ‘मासिक पाळी स्वच्छता दिन’ म्हणून जाहीर केला आहे. यानिमित्ताने मासिक पाळी म्हणजे काय आणि या काळात स्त्रीला धार्मिक कृत्यांपासून लांब ठेवणे कितपत शहाणपणाचे आहे? हे जाणून घेऊया.

मुलगी वयात आल्यावर दर महिन्याला योनीमार्गातून अंदाजे 3 ते 5 दिवस रक्त वाहते. या शारीरिक क्रियेला ‘मासिक पाळी’ असे म्हणतात. स्त्रीबीजाचा पुरुषाच्या शुक्रबीजाशी  संयोग न झाल्याने ते निरुपयोगी बीज शरीरातून बाहेर फेकले जाते. मासिक पाळीचे हे चक्र 28 ते 35 दिवसांचे असते. निरोगी स्त्रीमध्ये सर्वसाधारणपणे हे चक्र वयाच्या 11/12 व्या वर्षापासून सुरू होते ते 50 साव्या वर्षापर्यंत नियमितपणे चालू राहते.

विज्ञान सांगते त्याप्रमाणे मासिक पाळी सुरू होणे म्हणजे दर महिन्याला मुलीच्या गर्भाशयात पेशी आणि रक्तवाहिन्यांचे गादीसारखे एक मऊ अस्तर (भिंतीसारखा पापुद्रा) तयार होणे आणि मुलीच्या स्त्रीबीज ग्रंथीतून एक परिपक्व स्त्रीबीज तयार होऊन त्यात येणे. या स्त्रीबीजाचा पुरुषाच्या शुक्राणूशी जर संयोग झाला तर त्यातून गर्भधारणा होते. म्हणजे मूल जन्माला येण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू होते. त्या गर्भाला या अस्तरातील रक्तवाहिन्यांकडून रक्तपुरवठा होतो, पेशींतून पौष्टिक द्रव्येही मिळतात. त्यामुळे गर्भाची वाढ होऊ लागते. म्हणजे आपण सर्वचजण जे जन्माला आलो आहोत ती या अस्तराच्या कृपेमुळेच. हे अस्तर म्हणजे आपला पोषणकर्ता असतो आणि त्यालाच आपण अपवित्र, अशुद्ध, अस्वच्छ व विटाळ मानायचे म्हणजे पोषक अन्नपदार्थ असलेल्या जेवणाच्या भरलेल्या ताटाला घाणीने भरलेले ताट म्हणण्यासारखा प्रकार झाला.

मात्र स्त्रीबीज आणि पुरुषाचा शुक्राणू यांचा संगम झाला नाही तर गर्भाशयातील हे अस्तर तसेच ठेवले जात नाही. ते शरीराच्या बाहेर फेकले जाते. कारण ते तसेच राहिले तर कालांतराने अशुद्ध बनू शकते. कारण त्यात रक्तवाहिन्यांतील रक्तही असते आणि पेशींतील रंगरहित द्रवही असतो. तोच दर महिन्यात बाहेर टाकणे आवश्यक असते. त्यालाच आपण रक्तस्राव म्हणतो… मासिक पाळी म्हणतो वा दर महिन्याला होतो म्हणून ऋतूस्रावही म्हणतो. यातील रक्त हे अशुद्ध मुळीच नसते, उलट ते पूर्णतया शुद्ध असते. हृदयातून संपूर्ण शरीरात प्राणवायूयुक्त (ऑक्सिजन असलेले) रक्त पुरविणाऱ्या रोहिणींतून आलेले हे शुद्ध रक्त असते. शिवाय पेशींतून आलेली पौष्टिक द्रव्येही असतात. ती फ्लश आऊट (म्हणजेच बाहेर टाकणे) केली जातात. पुढच्या महिन्यात परत बीजारोपण झाले तर तेवढाच पौष्टिक आहार व शुद्ध रक्त गर्भाशयातील गर्भाला मिळावा म्हणून हा निसर्गाचा क्रम आहे. तो जेवढा शुद्ध आहे तेवढाच पवित्रही आहे.

पूर्वी स्त्रीची पाळी चालू झाली की तिला ‘बाहेरची आहे’, ‘विटाळशी आहे’, ‘कावळा शिवलेली’, असे संबोधले जायचे. अजूनही काही घरी हा प्रकार चालतो. सामाजिक सुधारणांमुळे हल्ली अशा स्त्रीला वेगळे बसवले जाण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. ‘आज की नारी’ मुळात घरी कमी काळ असते. घरचे व ऑफिसचेही सर्रास सर्व व्यवहार व्यवस्थितपणे ती करत असते. त्यामुळे तिला बाजूला बसणे/बसवणे शक्यही नाही. पण तरीही घरातली एखादी श्रावणातील पूजा, गणपती, लग्न, मुंज यांसारख्या कार्यांच्या वेळी पाळी येऊ नये यासाठी बऱ्याच जणींचा आटापिटा असतो. त्यासाठी पाळी लांबवण्याच्या गोळ्याही त्या घेत असतात. कारण ‘विटाळ’ ही संकल्पना अजून अनेकांच्या मनात ठाण मांडून बसली आहे. पण आपण हे विसरतो की, या तथाकथित विटाळातूनच आपला जन्म झाला आहे. याचा अर्थ मासिक पाळी ही स्त्रीकडे असलेली सृजन शक्ती आहे. पण अजूनही ऑफिसमध्ये कितीही उच्चाधिकारी असलेली उच्चशिक्षित स्त्रीसुद्धा मासिक पाळीचा वैज्ञानिक अर्थ लक्षात न घेता अंधश्रद्धेची बळी ठरलेली दिसते. अर्थात काही सुशिक्षित किंवा सुधारित कुटुंबे आपल्या लेकी-सुनांना पूजा, लग्नकार्य अशा प्रसंगांत पाळी असताना सहभागी करून घेतातही. पण एकतर अशांचे प्रमाण आजही नगण्य आहे आणि अपवादात्मकच. दुसरी गोष्ट म्हणजे ते ही बाब जाहीर बोलूनही दाखवत नाहीत.

मासिक पाळीचा स्राव ज्या वेळेस स्त्रीला होतो त्या वेळेस अनेकींना अशक्तपणा जाणवत असतो. ओटीपोटात दुखते. संप्रेरकांतील होणाऱ्या बदलांमुळे चिडचिडेपणा वाढणे, निराशेचे झटके येणे, अतिशय अस्वस्थ वाटणे असे घडणे हे स्वाभाविक आणि नैसर्गिक असते. तेव्हा ते पुरुषांनी समजून घेणे आवश्यक आहे. जसे शौचाला जाताना कधी कधी पोटात मुरडा येतो, पोटदुखी होते, गुदद्वारात जळजळ होते तसेच मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनासुद्धा पोटदुखीचे त्रास होऊ शकतात. पूर्वीच्या काळी घरात, स्वयंपाकात स्त्रियांना अतिशय श्रमाचे काम करावे लागायचे. अशा वेळी त्यांना सक्तीची विश्रांती मिळावी या प्रयोजनाने त्यांना सक्तीने कोपऱ्यात बसविले जाण्याची प्रथा सुरू झाली असण्याची शक्यता आहे. दुसरे कारण म्हणजे तिच्या योनीमार्गातून होणारा रक्तस्राव. पूर्वीच्या काळी सॅनिटरी नॅपकिन्स वगैरेंचा शोध लागलेला नसल्याने, चिंध्या-फडकी ठेवून काम भागवले जायचे. तरीही जर अतिश्रमाने स्राव जास्त झाला आणि त्याच्या काही खुणा जर घरातील जमिनीवर आढळल्या तर सणासुदीला अथवा पूजेला जमणाऱ्या गर्दीत ते पटकन कुणाच्याही नजरेत येऊ शकेल, म्हणून कदाचित या स्त्रियांना वेगळे ठेवले गेल्याची शक्यता आहे. शरीराच्या स्वास्थ्यासाठी शरीरातील या उत्सर्जन स्रावाच्या वेळी वेगळे राहणे आवश्यक आहे असे छदम वैज्ञानिक कारण देणाऱ्यांनी मग याच न्यायाने शौच व लघुशंका होते म्हणून कायम वेगळेच राहिले पाहिजे. पण आपण जसे प्रातर्विधी उरकून हातपाय स्वच्छ धुतो आणि एकमेकात सहज मिसळतो तसेच मासिक पाळीच्या काळात जर आपण स्वच्छतेचे नियम पाळले तर वेगळे बसायची गरजच नाही. शेवटी हीसुद्धा उत्सर्जन द्रव्येच नाहीत काय?

जुन्या काळी अज्ञानामुळे एक वेळ विटाळ पाळणे समजण्यासारखे होते, पण आजच्या आधुनिक युगात अशा या निरर्थक, काहीही शास्त्रीय कारणमीमांसा नसलेल्या परंपरा पाळण्याचे कारणच काय? तरीही अनेक बायका श्रावणातील साधी नेहमीची पूजासुद्धा आपल्या पाळीच्या डेटस् बघून ठरवतात. जसे काही पाळी चालू असताना धार्मिक कर्मकांडाच्या गोष्टी केल्या तर त्या स्त्रियांना लगेच आपले अमंगळ होणार आणि पाप लागणार अशी भीती वाटते! ह्या प्रकारच्या अंधश्रद्धा आजही अगदी शिक्षित घरातही पाळल्या जातात. प्रवासाच्या दृष्टीने विचार केला तर एक वेळ ठीक आहे. लांबच्या प्रवासाच्या दिवसांतच नेमक्या पाळीच्या डेटस् येत असतील तर पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या घेणे एक वेळ सयुक्तिक ठरेल. कारण आपल्याकडे स्वच्छतागृहाच्या सोयी पुरेशा नसतात. परंतु सतत घरात होणाऱ्या धार्मिक कर्मकांडांच्या पोटी उगाच ऊठसूट या अशा प्रकारच्या गोळ्या घेणे नक्कीच स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून बरोबर नाही.

म्हणून लक्षात ठेवा, मासिक पाळी ही स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक उत्सर्जनाची नैमित्तिक घटना असते. तिला अंधश्रध्देच्या विळख्यात अडकवणे म्हणजे स्त्रीला मानसिक दास्यात अडकवणे होय. पुरुषाचे वीर्यस्खलन जर नैसर्गिक व अपवित्र मानले जात नसेल तर स्त्रीची मासिक पाळीही तेवढीच पवित्र आणि नैसर्गिक मानली गेली पाहीजे. पण या काळात एकूणच स्वच्छता राखणे हेही तेवढेच महत्त्वाचे.

याबाबतीत मध्ययुगीन संत सोयराबाईचे उदाहरण विचार करण्यासारखे आहे. संत सोयराबाई या संत चोखामेळा यांच्या पत्नी. विटाळ होईल म्हणून पाळीचे चार दिवस घरातल्या भांडय़ालाही स्पर्श करायचा नाही, अशा काटेकोर रुढींचा तो काळ होता. अशा काळात ज्याची सावलीही अंगावर पडणे म्हणजे पाप, अशा अस्पृश्य महार समाजातील स्त्रीने चक्क ‘विटाळाचे अभंग’ लिहिले. या अभंगांनी जातपातीचा विटाळ मानणाऱ्यांची तोंडे चांगलीच रंगवली.

देहासी विटाळ म्हणती सकळ।

आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध।।

देहींचा विटाळ देहींच जन्मला।

सोवळा तो झाला कवण धर्म।।

विटाळ वांचोनी उत्पत्तेचे स्थान।

कोणा देह निर्माण नाही जगी।।

म्हणुनी पांडुरंगा वानितसे थोरी।

विटाळ देहांतरी वसतसे।।

देहाचा विटाळ देहीच निर्धारी।

म्हणतसे महारी चोखियाची।।

या अभंगातून अशिक्षित, पण वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या सोयराबाईने आपल्याला माणूसपण शिकवले असेच म्हणायला हवे.

 [email protected]