वेधक – एव्हरेस्ट चढून जाणारे पहिले ज्येष्ठ

>> मेघना साने

मुंबईतील एक जाहिरात व्यावसायिक, कला दिग्दर्शक शरद कुलकर्णी आणि त्यांची पत्नी अंजली कुलकर्णी यांनी वयाच्या पन्नाशीनंतर जगातील सात खंडातील सात सर्वोच्च शिखरे चढून जाण्याचे स्वप्न पाहिले. जवळ जवळ पंधरा ते वीस हाफ मॅरेथॉन्स व दोन फुल मॅरेथॉन धावण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. मात्र सात शिखरे चढून जाणे तेवढे सोपे नव्हते. त्यासाठी धावण्याचा सराव, बेसिक माऊंटेनिअरिंगचा कोर्स, रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग, ग्लेशियर ट्रेनिंग इत्यादी सर्व प्रकारचे प्रशिक्षण घ्यावे लागते. बर्फाच्छादित प्रदेशात कमी ऑक्सिजनवर राहण्याची शरीराला सवय करून घ्यावी लागते. मायनस 25 ते 30 टेम्परेचरमध्ये राहण्याचे नियम वेगळे असतात. शिवाय पर्वत चढताना येणारी हिमवादळे, छुप्या घळी यातून निभावून मार्गक्रमणा करावी लागते. शरद आणि अंजली कुलकर्णी यांनी ‘सेवन समिट्स’ करण्यासाठी आवश्यक ते ट्रेनिंग घेतले व एव्हरेस्ट चढून जाणारे भारतातील पहिले ज्येष्ठ नागरिक ठरले.

8 ऑक्टोबर 2014 रोजी शरद आणि अंजली या दांपत्याने आफ्रिकेतील माऊंट किलिमांजारोच्या उहुरू पीकवर भारताचा झेंडा रोवून मोहिमेची सुरुवात केली. नोव्हेंबर 2014 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये कोझिओस्कोसहित ‘ऑसी 10 चॅलेंज’ दोघांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. 2016 मध्ये ‘लोबुचे’ पीक पूर्ण केले. पहिल्यांदा लोबुचेची चढाई करताना त्याच्या आसपासच भूकंप झाल्याची वार्ता आली. लोबुचेहून परत येताना अनेक घरांची व हॉटेलांची पडझड झालेली दिसली. अवघ्या नेपाळला हादरवून टाकणाऱ्या महाप्रलयकारी भूकंपाच्या धक्क्याने अनेक लोक जखमी झाले होते. शरद आणि अंजली यांना परतीच्या वाटेवर दिसलेल्या एका टेम्पररी रेस्क्यू कॅम्पमध्ये डॉक्टरांची परवानगी घेऊन  ते लगेच कामाला लागले. तेथील जखमी लोकांना हेलिकॉप्टरमध्ये नेण्यास मदत केली. अंजली यांनी अनेक जखमींना धीर दिला. पुढे परतीच्या वाटेवर 12 तास चालल्यानंतर एका ताडपत्री मांडवाखाली आश्रय मिळाला. आणखीही काही ठिकाणी भूकंपाचे धक्के बसत होते. अशा अचानक येणाऱ्या संकटांनाही गिर्यारोहकाला तोंड द्यावे लागते. अखेर नेपाळ येथून लुकला ते काठमांडू अन् काठमांडू ते दिल्ली असे या गिर्यारोहकांना घेऊन जाण्यासाठी भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर आले. त्यामुळे त्यांना घरी जाता आले. 2015 मध्ये भूकंपामुळे लोबुचे शिखरही चढाई न करता आल्यामुळे शरद आणि अंजली यांनी 2016 मध्ये पुन्हा लोबुचेसाठी प्रयाण केले. दोराच्या साहाय्याने वर चढण्याचा सराव येथे कामी आला. या उभयतांनी केलेलं हे पहिलं शिखर होतं. मात्र 6120 मीटर चढून भारताचा ध्वज लोबुचे शिखरावर फडकवून त्यांनी ही मोहीम यशस्वी केली. त्यानंतर 2017 मध्ये ‘मेरा पीक’ सर केले. मात्र हे शिखर चढताना बर्फाच्या वादळाला तोंड द्यावे लागले.

1953 साली सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग यांनी सर केलेल्या जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखरावर चढून जाणे हे स्वप्न मनाशी बाळगून अंजली व शरद यांनी 2019 साली तयारी सुरू केली. एव्हरेस्ट बेस कॅम्पचे ट्रेनिंग तर त्यांनी दहा वर्षांपूर्वीच घेतले होते. त्यानंतर त्यांनी हिमालयातील काही ट्रेक केले. धावण्याचे ट्रेनिंग घेऊन (42.7 किलोमीटर) फुल मॅरेथॉनची मजल मारली. अंजली व शरद यांना सुरेंद्र शेळके यांनी एव्हरेस्टसाठी प्रेरित केले आणि वयाच्या साठाव्या वर्षीही तुम्ही एव्हरेस्ट चढू शकाल असा विश्वास दिला. यापूर्वी एक जपानी माणूस 80 वर्षांचा असताना एव्हरेस्ट सर करू शकला होता ही माहिती त्यांनी दिली. मग दोघांनी पंधरा दिवसांचे प्री-एव्हरेस्ट ट्रेनिंग किशोर धनकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आणि एव्हरेस्ट चढण्यासाठी निघाले.

एव्हरेस्ट चढताना बर्फाची उभी भिंत शिडीने चढावी लागली. कधी बर्फाच्या वादळांना तोंड द्यावे लागले. कधी कधी हिमकडे कोसळतात. बर्फाचे मोठे दगड गडगडत खाली येत. त्यात सांभाळून पुढे जावे लागते. कधी जखमाही झेलाव्या लागतात. पर्वतांमध्ये असलेल्या छुप्या घळय़ांमध्ये पाय ठेवला तर तो भसकन खाली जाऊ शकतो. 2019 मध्ये अंजली व शरद एव्हरेस्ट चढण्यासाठी निघाले त्या वर्षी गिर्यारोहकांची भरपूर गर्दी झाली होती. त्यामुळे रांगेने चढायला खूप वेळ लागत होता. एव्हरेस्ट जवळ येता येता बऱ्याच लोकांचा ऑक्सिजन सिलिंडर संपत होता. यात एक अत्यंत वाईट घटना घडली. अंजली चढत असताना त्यांचे पाय बर्फात फसले व त्या तिथेच बसून राहिल्या. त्यांच्या बरोबर असलेला शेर्पा त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला ते जमले नाही. दुसरा शेर्पा व शरदजी तेथे पोहोचले तेव्हा अंजली यांचे शरीर गार पडत होते. तिघांनी प्रयत्न करूनही त्यांना अंजली यांना उभे करता आले नव्हते. शेवटी त्यांचा ऑक्सिजन शून्यावर गेला व प्राण निघून गेला. शरद यांना तशा दुःखी अवस्थेत हिमालय उतरावा लागला. त्यांचाही ऑक्सिजन संपेल म्हणून शेर्पाने त्यांना निघण्याची घाई केली. बर्फाच्या वादळामुळे शरद यांचा एक डोळा अधू झाला होता. शेर्पालादेखील फ्रॉस्ट बाइट झाला होता. अनेक अडचणी पार करत ते बेस कॅम्पवर आले.

एव्हरेस्ट सर करणे हे अंजली व शरद दोघांचे स्वप्न होते. ते अपुरे राहिले, पण अंजलीला श्रद्धांजली म्हणून शरद यांनी पुन्हा एव्हरेस्टवर जाण्याचे ठरवले. अंजली यांच्या मृत्युनंतर त्यांची काही वर्षे डिप्रेशनमधे गेली होती, पण 2023 साली पुन्हा पूर्ण तयारीनिशी ते एव्हरेस्ट चढून गेले. त्या पूर्वी दक्षिण अमेरिकेतील अकांकागुआ (6962 मीटर), रशियातील माऊंट एल्ब्रस (6542 मीटर), उत्तर अमेरिकेतील माऊंट देनाली (6194 मीटर) व अंटार्क्टिकामधील माऊंट विन्सन (4892 मीटर) ही अतिशय अवघड समजली जाणारी शिखरे त्यांनी सर केली.

एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच (8848 मीटर) शिखर आहे. हे शिखर चढून जाणारे शरद कुलकर्णी हे भारतातील पहिले ज्येष्ठ नागरिक ठरले. ते महाराष्ट्रातील ठाणे येथील रहिवासी आहेत. त्यांच्या सेव्हन समिट्सच्या रोमहर्षक आणि जिद्दीच्या कहाणीवर त्यांनी ‘ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट’ हे  पुस्तक लिहिले आहे. अमलताश बुक्सने ते प्रकाशित केले आहे. अंजली यांच्या कामगिरीची दखल घेऊन ठाणे महापालिकेतर्फे श्रीनगर, ठाणे येथील प्रमुख मार्गाला 3 मे 2022 रोजी त्यांचे नाव देण्यात आले.

[email protected]