
बल्लारपूर – राजुरा दरम्यान निर्मानाधिन राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुणी व तिच्या आईचा जागीच मृत्यू झाल्याने घटना घडली. ज्योती रागीट (42) व त्यांची मुलगी सेजल बंडू रागीट अशी त्या दोघा मायलेकींची नावं आहेत.
या दोघीही दुचाकीने राजुरा येथुन बल्लारपूरकडे जात असताना वर्धा नदीचा पुलाजवळ अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिली. बामणी – राजुरा ते आदिलाबाद या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याची उंची वाढविण्याकरीता मातीचे ढिगारे टाकण्यात आले. कुठल्याही प्रकारचे ठोस नियोजन नसल्याने या धिगाऱ्यावरील माती रस्त्यावर येत आहे. पावसात घसरून तर पाऊस नसताना प्रचंड धुळीचे साम्राज्य या ठिकाणी बघायला मिळत आहे.
नुकत्याच झालेल्या पावसात तर भररस्त्यात चिखल होऊन अनेकांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागला. या मार्गावरून नेहमीच प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत असून वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, अन्यथा अनेकांना प्राणाला मुकावे लागणार असल्याची भीती प्रवाशी व्यक्त करीत आहेत. येथे वारंवार होत असलेल्या अपघात व मृत्यूमुळे परिसरातील नागरिकांत राष्ट्रिय महामार्गाच्या कार्यावर तीव्र रोष व्यक्त होत आहे.