
>> गुरुनाथ तेंडुलकर
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय. स्थितप्रज्ञ मनुष्याची लक्षणं समजावण्यासाठी महर्षी वेदव्यासांनी भगवान श्रीकृष्णाच्या तोंडी एक-दोन नव्हे, तब्बल अठरा श्लोकांची रचना केली आहे. एवढं मोठं विवेचन करण्यामागचा हेतू एकच… माणसाला जर आत्मोद्धार करून घ्यायचा असेल तर त्याला त्यासाठी स्थितप्रज्ञता अंगी बाणवावी लागतेच लागते.
आपल्या आजूबाजूच्या सगळ्या यशस्वी माणसांकडे जरा नीट निरखून-पारखून पाहिलं तर आपल्याला त्या सगळ्या यशस्वी व्यक्तींमध्ये काही समान गुणधर्म आढळतील. अगदी क्रिकेटच्या क्षेत्रातील सचिन तेंडुलकर ते संगीत क्षेत्रातील लता मंगेशकरांपर्यंत. अभिनयाच्या क्षेत्रातील अमिताभ बच्चनपासून ते उद्योग क्षेत्रातील मुकेश अंबानीपर्यंत. सामाजिक कार्यातील डॉ. प्रकाश आमटेंपासून ते राजकारणातील नरेंद्र मोदींपर्यंत. अनेक क्षेत्रांतील अनेक व्यक्तींची नावं सांगता येतील. तुमच्या दृष्टीने तुम्हाला जी माणसं उत्तुंग वाटतात त्या व्यक्तींच्या चरित्राकडे बारकाईने पहा. या सगळय़ा मंडळींनी स्थितप्रज्ञता अंगी बाणवलेली असते.
एका वेळी एकच काम… एकच ध्येय… एकच लक्ष्य… आणि कार्य करताना त्यात स्वतला झोकून द्यायचं. इंग्रजीत त्याला ‘फ्लो स्टेट’ असं म्हणतात.
डेमन झहारियादास नावाच्या लेखकाचं ‘द आर्ट ऑफ फाइंडिंग फ्लो’ नावाचं एक पुस्तक आहे. कोणत्याही कार्यात एकाग्रता कशी साधावी, याचं छान विवेचन त्या पुस्तकात आहे. हे पुस्तक वाचताना मला एक गोष्ट सतत जाणवत होती की, यात जे काही आहे ते सगळं सगळंच आपल्या भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. असो. स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना भगवान सांगतात,
दुःखेषु अन् उद्विग्न मनाः । सुखेषु विगतस्पृहा ।
दुःखाने उद्विग्न व्हायचं नाही, खचून जायचं नाही आणि सुखाने हुरळून जायचं नाही. सुखाच्या मागे धावून स्वतच्या मनाचा समतोल बिघडवायचा नाही.
पुढे भगवान म्हणतात –
यदा संहरते च अयम् कूर्मो अंगानि इव सर्वश ।
इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।। 58।।
भावार्थ ः कासव ज्या प्रकारे आपले सगळे अवयव आखडून घेतो त्याप्रमाणे एखादी व्यक्ती आपली सगळी इंद्रिये तिच्या अयोग्य विषयांपासून आवरून घेते, त्या वेळी त्या व्यक्तीची बुद्धी स्थिर होते.
इथे कासवाचा दृष्टांत अत्यंत समर्पकपणे वापरला आहे. कासव नेहमीच्या अवस्थेत ज्या वेळी चालत असतं त्यावेळी त्याचे चार पाय, शेपूट आणि डोकं हे सहा अवयव आपल्याला दिसतात. त्या सहा अवयवांच्या सहाय्याने कासव आपली नित्य-नैमित्तिक कर्मे करतो. खाण्यापिण्यापासून ते आहारविहारापर्यंत सगळी कामं करताना कासवाचे सहाही अवयव कार्यरत असतात, पण… जरा कुठे धोका जाणवला की, कासव हे सगळेच्या सगळे सहाही अवयव आपल्या कवचाच्या आत ओढून घेतं. आता बाह्य जगाच्या दृष्टीने केवळ आणि केवळ त्याची टणक पाठच शिल्लक असते.
इंग्रजीत यालाच ‘विड्रॉवल’ असं म्हणतात. जराशा धोक्याची सूचना मिळाली की, सगळेच्या सगळे अवयव आत. यावर विवेचन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
देखें कूर्माचिया परी । उवाइला अवेव पसरी ।
नातरी इच्छावशे आवरी । आपुले आपण ।।
तैसीं इंद्रिये आपैती होती । जयाचें म्हणितले करिती ।
तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ।।
माणसाच्या बाबतीत हे सहा अवयव म्हणजे आपली पाच ज्ञानेंद्रिये आणि त्या ज्ञानेंद्रियांकडून मिळालेल्या सूचनेप्रमाणे विचार करणारं आपलं मन हे सहावं इंद्रिय. डोळे ज्यांनी आपल्याला बाहेरचं दिसतं. कान ज्यामुळे आपण बाहेरचे आवाज ऐकतो. नाक ज्याच्या सहाय्याने आपल्याला सुगंध किंवा दुर्गंधाची जाणीव होते. जीभ ज्यामुळे आपल्याला खाद्य पदार्थांची चव कळते आणि त्वचा ज्यामुळे आपल्याला स्पर्शाचं ज्ञान होतं. हा स्पर्श केवळ मऊ-टणक किंवा गरम-थंड एवढाच मर्यादित नसतो, तर तो बरा आणि वाईट अशा दोन्ही स्वरूपाचा असतो. म्हणूनच वयात येऊ घातलेल्या मुलीला आई किंवा घरातली मोठी स्त्राr कोणता स्पर्श सहन करायचा आणि कोणता नाही हे समजावून सांगते. अलीकडे शाळांतूनही लहान मुलींना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ यातील नेमका फरक समजावून सांगितला जातो.
तर अशा प्रकारची ही पाच ज्ञानेंद्रियं आणि या पाच इंद्रियांच्या एकीकरणातून किंवा समन्वयातून (इंग्रजीत ज्याला युनिफिकेशन अँड काम्बिनेशन म्हणतात) तयार झालेलं तरीही त्याच्याहून भिन्न असं मन हे सहावं ज्ञानेंद्रिय. पाच ज्ञानेंद्रियांकडून मिळालेल्या रूप, ध्वनी, गंध, रस आणि स्पर्श यांचे पृथक्करण करून मन आपल्या पाच कर्मेंद्रियांना सूचना देते. ही पाच कर्मेंद्रियं म्हणजे तोंड (बोलण्यासाठी), हात (कोणत्याही प्रकारचं काम करण्यासाठी), पाय (चालण्या-पळण्यासाठी, स्थलांतर करण्यासाठी), मूत्रद्वार – गुदद्वार (शरीरातील अनावश्यक घटकांचे उत्सर्जन करण्यासाठी) आणि उपस्थ म्हणजेच लैंगिक अवयव (पुनरुप्तादनासाठी).
ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या जाणिवेनुसार आणि त्यानंतर मनाने दिलेल्या सूचनेनुसार ही पाच कर्मेंद्रिये आपापली कामं करतात, परंतु अनेकदा असं होतं की, आपली ज्ञानेंद्रियं नेमकं तेच करतात, जे मनाला करावंसं वाटतं. मनाला जे वाटतं तेच डोळ्यांना दिसतं. वास्तविक आधी डोळ्यांना दिसून नंतर मनाने निर्णय घ्यायला हवा, पण अनेकदा नेमकं उलटच होतं.
अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्याला दारू प्यावीशी वाटली तर त्याला अगदी अनोळखी रस्त्याने जातानादेखील दारूचं दुकान नजरेस पडतं. याचं कारण म्हणजे त्याची नजर दारूच्या दुकानाचाच शोध घेत भिरभिरत असते.
इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या निमित्ताने आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना सांगताहेत की, कासव जसा जराशा धोक्याची जाणीव झाली तरी आपले सगळे अवयव कवचात ओढून घेतो तसं माणसाने वागायला हवं. कोणत्याही प्रकारच्या मोहाला, प्रलोभनाला किंवा बाह्य झगझगाटाला भुलून आपलं ठरवलेलं उद्दिष्ट सोडायचं नाही. एक छोटीशी घटना थोडक्यात सांगतो. गावातल्या कॉलेजमध्ये शिकणारे, शेवटच्या वर्षाची परीक्षा दिलेले सहा विद्यार्थी मित्र थोडीशी गंमत जंमत करू या म्हणून मुंबईला गेले. रात्रीची मुंबई कशी असते त्याचा अनुभव घेण्यासाठी एका लेडीज डान्स बारमध्ये शिरले. तिथे दारू प्यायले. नाचणाऱया बाईवर पैसे उडवले. तेवढय़ावरच न थांबता त्यातल्या दोघी जणींना घेऊन जवळच्याच एका लॉजवर गेले आणि… पण त्या मित्रांमध्ये एकजण असा होता की, ज्याला या गोष्टी पटत नव्हत्या. तो त्या मित्रांसोबत मुंबईला आला, मुंबईतील सौंदर्यस्थळं पाहिली, वडापावपासून भेळपुरी-शेवपुरीचा आस्वाद घेतला, पावभाजी खाल्ली, पण दारू मात्र प्यायला नाही. “मी बारमध्ये येणार नाही. मी दारू पिणार नाही.’’ असं निक्षून सांगितलं. इतर मित्रांनी त्याला ‘कंजूष’ म्हणून हिणवलं. काहीजणांनी तर “तू नामर्द आहेस’’ अशी अवहेलनादेखील केली, पण त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही.
आज सहा-आठ वर्षांनंतर त्या सहा मित्रांपैकी पाचजणांना असाध्य लैंगिक रोगाची लागण झाली आहे. ते पाचही जण आयुष्यातून उठलेत. भावनेच्या भरात केलेली क्षणभराची मजा त्यांच्यासाठी आयुष्यभराची सजा ठरलीय. पण तो सहावा मुलगा मात्र आज तो सरकारी नोकरीत आहे. व्यवस्थित कमावतोय. त्याचं लग्नदेखील झालंय. आपल्या बायको-मुलाबरोबर तो आनंदात संसार करतोय.
तो मुलगा कुणी फार मोठा उद्योगपती किंवा फिल्मस्टार नाही. तरीही त्याने त्या वेळी स्थितप्रज्ञतेचा गुण दाखवला. कासवाप्रमाणे आपली सगळी पाचही ज्ञानेंद्रियं आणि मन योग्य वेळी ताब्यात ठेवलं.
कोणत्याही क्षेत्रातील यशासाठी स्वयंशिस्त म्हणजे स्वतच स्वतला लावलेली शिस्त ही आवश्यक आहे. स्वयंशिस्तीसाठी आत्मसंयमन आवश्यक आहे. आत्मसंयमासाठी सदसद्विवेक बुद्धी म्हणजेच बरं काय आणि वाईट काय याची जाणीव आवश्यक आहे. सदसद्विवेक बुद्धीसाठी योग्य ज्ञान आवश्यक आहे.
आणि या योग्य ज्ञानासाठी सगळ्या ज्ञानाचं सार ज्या ग्रंथात आहे त्या केवळ सातशे श्लोकांच्या महाग्रंथाचा भगवद्गीतेचा अभ्यास आवश्यक आहे.
‘भगवद्गीतेचा अभ्यास कशासाठी करायचा?’ या प्रश्नाचं मला सापडलेलं उत्तर मी तुम्हाला सांगितलं.
बघा…विचार करा…आणि पटलं तर सांगा.