कृत्रिम तलावांतील विसर्जनाच्या सक्तीमुळे चेंगराचेंगरीचा धोका! विसर्जन नैसर्गिक जलस्रोतामध्ये करण्याची परवानगी द्या

गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या गर्दीच्या नियोजनाची व्यवस्था कृत्रिम तलावाच्या ठिकाणी होणे अशक्य आहे. महाकाय मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची सक्ती केल्यास चेंगराचेंगरीचा धोका असल्याचे सांगत मोठय़ा मूर्ती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याची परवानगी द्या, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने केली आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पीओपी मूर्तींवरील बंदी उठवल्यामुळे मुंबईत प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीदेखील महाकाय मूर्ती साकारल्या जाणार आहेत. मात्र पालिकेच्या निर्देशामुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

सूचना पाठवण्याचे आवाहन

मोठय़ा गणेशमूर्तींचे विसर्जन नेमके कसे करावे याबाबत राज्य सरकारने तोडगा काढावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबत गणेशोत्सव समन्वय समिती सरकारला विसर्जनाबाबत सूचना, नियम सुचवणारा मसुदा राज्य सरकारला सादर करणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी नैसर्गिक स्रोतांमधील विसर्जनाबाबत  काही सूचना, नियम [email protected] ई-मेल आयडीवर या 18 जूनपर्यंत सूचना पाठवाव्यात, असे आवाहनही समितीने केले आहे.