शांत झोप लागावी म्हणून विस्तार लांबवतायत, बच्चू कडू यांचा खोचक टोला

शिंदे-फडणवीस सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सरकारसोबत असणाऱ्या सगळय़ा आमदारांना शांत झोप लागावी म्हणून मंत्रिमंडळ विस्तार लांबवतायत, असा खोचक टोला शिंदे-फडणवीसांना लगावला.

फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत दिले आहेत, पण यावर सरकारला समर्थन देणाऱ्या आमदारांचा विश्वास राहिलेला नाही. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी विस्तारासंदर्भात खोचक शब्दांत टोला लगावला आहे. आता विस्तार झाला तर 20 आमदारांनाच मंत्रीपद मिळेल. त्यामुळे बाकीचे आमदार नाराज होतील. ते बिचारे मग चांगली झोप घेणार नाहीत. सगळय़ांना चांगली झोप घेता यायला पाहिजे म्हणून मंत्रीमंडळ विस्तार लांबवतायत, असे बच्चू कडू म्हणाले.