मराठी टिकविण्याचा प्रयत्न अभ्यासक्रमातून झाला पाहिजे! सुषमा अंधारे यांचे मत

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातच पूर्वी पहिली मातृभाषा, दुसरी आदान-प्रदानाची म्हणून हिंदी आणि तिसरी जगाची इंग्रजी भाषा शिकली पाहिजे, अशी रचना होती. मात्र, नव्या धोरणात त्रिभाषा सूत्र हे मातृभाषा जगविणारे नाही. मराठी ही मातृभाषा टिकविण्यासाठी ती अभ्यासक्रमातून शिकविली पाहिजे, असे स्पष्ट मत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.

कॉम्रेड प्रभाकर मानकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘मराठीकरण, पहिलीपासूनचे त्रिभाषा सूत्र : मराठी आणि महाराष्ट्राची तसेच एकंदर संघराज्य व्यवस्थेची केंद्र सरकार पुरस्कृत गळचेपी’ याविषयावर आयोजित परिसंवादामध्ये अंधारे बोलत होत्या. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव अजित नवले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते उल्हास पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) सरचिटणीस जयदेव गायकवाड, शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे, प्रा. दीपक पवार, सीआयटीयूचे अध्यक्ष अजित अभ्यंकर सहभागी झाले होते.

सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘भाषावार प्रांतरचना मांडताना विविध बोलींचा विचार केला. बारा कोसांवर भाषा बदलत जाते. त्याचा विचार केला गेला, त्यामुळे ती जगली. सध्या इंग्रजी शाळांचे फॅड वाढते आहे, त्यांना अनुदान नकोय, मला वारेमाप फी घेता येईल, मी शिक्षकांना कमी पगारात राबवून घेऊ शकतो, असं संस्थाचालकांना वाटतंय. त्रिभाषा सूत्री सातवीनंतर वापरा अशी भूमिका आमच्या पक्षाने घेतली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण कृती कार्यक्रम, कट्टा आयोजित करून चर्चा करू, मराठी भाषा टिकेल यासाठी प्रयत्न करू.

भाषा जगली पाहिजे, यासाठी आम्ही मराठवाड्यातल्या मराठी लोकांचा ग्रुप केला. त्यावर आम्ही मराठीविषयी चर्चा करतो. जसं आम्ही ‘क’ अक्षर घेऊन त्यावर १२०० म्हणी तयार केल्या, असे विधायक उपक्रम झाले पाहिजेत,’ असंही अंधारे म्हणाल्या. जयदेव गायकवाड म्हणाले, मराठी 15 हजार शाळा बंद झाल्या. त्या मुलांनी घरी बसायचं का? मुलांना शिक्षण नाही अशी परिस्थिती आहे आणि तिसरी भाषा शिकवायचा आग्रह धरता याची लाज वाटली पाहिजे.