धाड पडताच 500 रुपयांची बंडले खिडकीतून फेकली

ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे चक्क नोटांचा पाऊस पडला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. सरकारी इंजिनीयर असलेल्या वैकुंठ नाथ सारंगी याच्या घरावर दक्षता विभागाने टाकलेल्या धाडीत दोन कोटींची रोकड सापडली. धाड पडल्याने घाबरून गेलेल्या वैकुंठनाथने पाचशे रुपयांची बंडलं खिडकीतून बाहेर फेकायला सुरुवात केली. ओरिसातील ग्रामीण विकास विभाग दक्षता विभागाच्या रडारवर आहे.

उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती कमवल्याबद्दल या विभागाचा मुख्य अभियंता असलेल्या वैकुंठ नाथ सारंगी याच्याशी संबंधित सात ठिकाणी दक्षता विभागाने अत्यंत नियोजनबद्धरीत्या धाडी टाकल्या. सारंगीच्या केवळ घरातच नव्हे तर भुवनेश्वर, कटक, पुरी, बालासोर येथील ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. यामध्ये 50 हून अधिक अधिकारी आणि 26 पोलिसांचा समावेश होता. नोटांची बंडलं बघून आजूबाजूचे लोक थक्क झाले. काही लोकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर दक्षता पथकाने बंडले गोळा करून बॅगेत भरली.