
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आयसीसीच्या 12 व्या क्रिकेट विश्वचषकाला इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरुवात होणार आहे. परंतु त्यापूर्वी इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेमुळे सर्वच संघांचे धाबे दणाणले आहेत. कारण इंग्लंडमध्ये प्रथम फलंदाजी केल्यानंतर किती धावा सेफ राहतील याचा अंदाज बांधणे कठीण आहे.
#ICCWorldCup वर्ल्डकपमध्ये फक्त 36 धावांत ‘या’ संघाचा खुर्दा उडाला
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असता तरीही अमुक एक एवढ्या धावा केल्या तर विजयाची शक्यता वाढते हे सांगितले जाते. परंतु इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या पाच एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने पाहिले तर या सर्व शक्यता हवेत उडाल्या आहेत. कारण इंग्लंडने चौथ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने दिलेले 359 धावांचे लक्ष्य 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. तसेच तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने 373 धावांचा डोंगर उभारूनही त्यांना फक्त 12 धावांनी निसटता विजय मिळाला होता. पाकिस्तानने 361 धावांपर्यंत मजल मारत विजयाची शक्यता निर्माण केली होती.
Photo : 1975 ते 2015, आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे विजेते
2015 मध्ये झालेल्या विश्वचषकानंतर इंग्लंडमध्ये आतापर्यंत 56 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यात 18 वेळा 300 पेक्षा जास्त धावांचे आव्हान यशस्वीरित्या पार करण्यात आले आहे. याचमुळे इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकात प्रथम फलंदाजी करताना किती धावा केल्या तर विजयाची शक्यता वाढेल याबाबत संभ्रम आहे.