अर्नाळाच्या नवापूर-धसपाडामध्ये चार कर्मचाऱ्यांना विजेचा झटका; एकाचा मृत्यू, तीनजण जखमी

ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीदरम्यान विजेचा झटका लागून चार कर्मचारी जखमी झाले असून त्यात एकाच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विरारच्या नवापूरमधील धसपाडा परिसरात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत जयेश घरत (28) या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. उर्वरित तीनजण विजेच्या झटक्यामुळे लांब फेकले गेल्याने ते बचावले. या जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेनंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

विरार पश्चिमेतील अर्नाळा येथील नवापूर धसपाडा परिसरातील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला होता. या ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीसाठी महावितरणचे चार कर्मचारी रोहित्रावर चढले होते. दरम्यान परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र काम सुरू असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने रोहित्रावर चढलेल्या चौघांना विजेचा जोरदार झटका बसला. या झटक्यामुळे तीन कर्मचारी बाहेर फेकले गेले. तर जयेश घरत हा रोहित्रावर अडकून राहिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

वीजचोरीमुळे कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात
वसई तालुक्यातील पश्चिम पट्टा आणि किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट, लॉज, हॉटेल अनधिकृतपणे उभे केले आहेत. या सर्वच ठिकाणी वीजचोरी केली जाते. अनेक ठिकाणी इन्व्हर्टर आणि जनरेटरही सुरू असतात. या लॉज आणि हॉटेलमध्ये विजेची फिटिंग व्यवस्थित नसल्याने अनेक वेळा रिटर्न करंटचे प्रकार घडत आहेत. याच रिटर्न करंटमुळे वीज कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा सचिव हरिश्चंद्र पाटील यांनी केला आहे.