
इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रेयस अय्यरची निवड करणे आवश्यक असतानाही त्याला डावलण्यात आले आहे. श्रेयसवर अन्याय झाल्याची सर्वाची भावना असली तरी त्याच्यासाठी अद्याप कुणीही उभा राहिलेला नाही. त्याच्या निवडीबाबत हिंदुस्थानी संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला छेडले असता तो म्हणाला, मी निवड समिती सदस्य नाही, अशा एका वाक्यात त्याने उत्तर देणे टाळले. गेली दीड वर्ष संघात आतबाहेर होत असलेल्या अय्यरने गेल्या वर्षी कोलकात्याला आयपीएल जेतेपद जिंकून दिले होते तर या वर्षी पंजाबकडून खेळताना तो पुन्हा त्याच पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याच्या दिशेने पावले टाकतोय. श्रेयस हा यंदाच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार-फलंदाज आहे. त्याच्या खालोखाल गुजरातच्या शुभमन गिलचे नाव असले तरी त्याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.